मुंबई-पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना साधताना शरद पवार म्हणाले, माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मोलाची मदत केली. आता विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमचे पूर्ण सहकार्य राहील.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तीनही पक्ष एकत्रितपणे निर्णय घेतील. कोणताही निर्णय सामूहिक पद्धतीने घेतला जाईल, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.शरद पवार यांच्या विधानामुळे ही एकमेव जागा आता ‘ठाकरे गटा’च्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. पुढील महिन्यात खुद्द उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने, ते स्वतः मैदानात उतरणार की एखाद्या निष्ठावान सहकाऱ्याला संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमिताने महाविकास आघाडीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना खंबीर पाठिंबा दिला होता. आता या पाठिंब्याची शरद पवार ‘परतफेड’ करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. “विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल,” असा शब्द शरद पवार यांनी दिला आहे. या निर्णयामुळे विधानपरिषदेची महाविकास आघाडीची एकमेव जागा आता ‘ठाकरे गटा’च्या वाट्याला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या वाट्याला ८ तर महाविकास आघाडीला केवळ १ जागा मिळण्याची शक्यता आहे. या एका जागेसाठी आघाडीत रस्सीखेच सुरू होती, मात्र शरद पवारांच्या भूमिकेमुळे हा मार्ग मोकळा झाला आहे. या एका जागेवरून आघाडीत ओढाताण सुरू असतानाच शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.
विधान परिषदेच्या एकूण ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. यामध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर, शिवसेना शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांचा समावेश आहे.

