पुणे- येथे कालगुरुवारी अर्धा तास तुफान पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक सखल भागांत कंबरेपर्यंत पाणी साचले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत ‘स्मार्ट सिटी पुणे आता वॉटर किंगडम’ झाल्याचा टोला हाणला.
पुण्यात 2 एप्रिल रोजी 130 वर्षांनंतरचा विक्रमी पाऊस झाला. यापूर्वी 1896 साली एका दिवसात 51.1 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर काल गुरुवारी एकाच दिवसात 65 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या मुसळधार पावसाचा अनेकांना फटका बसला. शहरातील गंगाधाम चौकातील एक मोठी होर्डिंग पावसामुळे कोसळली. पण सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. पण यामुळे रस्ते वाहतूक मंदावली. दुसरीकडे, अन्य एका ठिकाणी झाड कोसळून 1 महिला दगावली. या घटनेत 2 जण बालंबाल बचावले. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार या प्रकरणी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, पुणेकरांनी भाजपला अगदी भरभरून दिलं. 6 आमदार, 119 नगरसेवक, 1 खासदार, भाजपाचे एक केंद्रीय मंत्री, राज्यातील एक कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री या पुणे शहरात राहतात. असं असताना काल अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात हे शहर अक्षरशः बुडालं. स्मार्ट सिटी पुणे आता वॉटर किंगडमकडे वाटचाल करत आहे.
इतरवेळी क्रेडिट घेण्यासाठी पुढे येणारे पुण्याचे स्वयंघोषित शिल्पकार यांनाच याचे श्रेय दिले पाहिजे. पुणेकरांना फुकटात वॉटर सफारी मिळाली.. अजून किती विकास पुणेकरांना हवा आहे? असा प्रश्न वडेट्टीवारांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
विजय वडेट्टीवार व विकास लवांडे या दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग असलेले एक बॅनर पोस्ट केले आहे. रस्त्याच्या अगदी शेजारी लावण्यात आलेले हे बॅनर पावसाच्या पाण्यात बुडाल्याचे दिसून येत आहे. या होर्डिंगवर फडणवीस यांचा उल्लेख पुण्याचे शिल्पकार व महाराष्ट्राचे नवे नेतृत्व म्हणून करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, स्वतःला पुण्याचे शिल्पकार म्हणवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण पुण्यातील कालचे चित्र पाहिले की नाही? स्मार्ट सिटी होणार होती, मेट्रो सिटी असे स्वप्न दाखवण्यापेक्षा दररोजच्या सांडपाण्याचे आणि कचऱ्याचे प्रश्न जर सरकारला सोडवता येणार नसतील आणि दर पावसाळ्यामध्ये पुण्यातील रस्ते, नाले,गल्ल्या तुडुंब भरणार असतील त्यात दरवर्षी लोकांचे मालमत्तेचे नुकसान होणार असेल तर आपले सरकार नेमके काय करते?
मागील दहा वर्षात पुणे महानगरपालिकेने आलेले कोट्यवधी रुपयांच्या विविध अनुदानाचे काय केले ? त्या पैशाची विल्हेवाट कुठे लावली की फक्त कंत्राटदारांना कामे देऊन कमिशन खाल्ले? असा प्रश्न पडतो, असे ते म्हणालेत.

