मुंबई, दि. १ एप्रिल २०२६.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली तरच यातील अनेकांचे खरे चेहरे उघडे पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या नावाखाली मलमपट्टी न करता अशोक खरातची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महायुती सरकारमधील अनेक मंत्री, आमदार यांनी अशोक खरातकडून पुजा करून घेतल्या आहेत, त्याचे तीर्थ घेतले आहे. राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा असताना राज्यातील मंत्रीच जर अशा प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे उद्योग करत असतील तर पुरोगामी महाराष्ट्राला ते शोभणारे नाही. हा प्रकार संविधानाची पायमल्ली करणारा आहे म्हणून अशोक खरातच्या दरबारात ज्या मंत्री, आमदार, नेत्यांनी हजेरी लावून त्याचा लाभ घेतला, त्या सर्वांवर अंधश्रद्धा विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातील प्रश्नावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांच्या फोटोवर अशोक खरातने फुली मारली होती अशी माहिती समोर येत आहे, हा प्रकार अतिरेकी त्यांच्या टार्गेटवर फुली मारतात तसाच आहे. तसेच अजित पवार यांच्या बंगल्याबाहेरही काही तरी अघोरी पुजा केल्याचा प्रकार उघड झाला होता. कोणाची खूर्ची खाली करावी व कोणाला त्या खुर्चीवर बसवावे यासाठी सुद्धा अघोरी पुजा केल्याचे समजते, हे सर्व गंभीर असून त्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैन मुनींच्या आशिर्वादाने गळा ठिक झाल्याच्या वक्तव्याबद्द विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सपकाळ म्हणाले की, महापौर रितु तावडे यांनी नवा शोध लावला आहे, याबदद्ल त्यांना नोबल पारितोषिक देऊन सन्मान केला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.

