मुंबई, दि. १ मार्च २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम रसिकांसाठी एक संस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरणार आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे दि. २ ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात येणार आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्ह्यातील निसर्गसंपन्न पर्यटन स्थळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळावे, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. या महोत्सवामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. नागरिक, शेतकरी, पर्यटक आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. दि. २ एप्रिल रोजी शाहिरी पोवाडा, ३ एप्रिलला भजनी मंडळ, ४ एप्रिलला ब्रास बँड पथकाचा थरार आणि ५ एप्रिलला लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक लोककला, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि नामांकित कलाकारांचे विशेष सादरीकरण यामुळे महोत्सव अधिक रंगतदार होणार आहे.
या कार्यक्रमांबरोबरच आनंदमेळा, बोटींग, घोडेस्वारी, पॅराग्लायडिंग, उंट सफारी, इलेक्ट्रिक बग्गी, कार्निवल परेड, कृषी प्रदर्शन, खाद्यजत्रा, पशु-पक्षी प्रदर्शन आणि शस्त्र प्रदर्शन यांसारखे विविध आकर्षक उपक्रम पर्यटकांना अनुभवता येणार आहेत. महिला बचत गटांना विशेष दालने उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांच्या हस्तकला आणि कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री हे महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे.
मनोरंजन विश्वातील अनेक नामवंत कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यामध्ये संस्कृती बालगुडे, जान्हवी किल्लेकर, स्पृहा जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव, कुशल बद्रिके, हेमांगी कवी, गायक रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर तसेच अभिजीत जाधव – आमु जाधव यांचा समावेश आहे.
डोंगरी पर्यटन महोत्सवादरम्यान पर्यटकांना स्थानिक संस्कृती, परंपरा आणि पर्यटनाची विविध रूपे अनुभवता येणार आहेत. ग्रामीण जीवनशैलीचा जवळून परिचय करून देण्यासाठी कृषी पर्यटनाशी संबंधित उपक्रम, सातारा जिल्ह्यातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविणारे पाककृती प्रदर्शन, तसेच बोटींग शर्यती, छायाचित्र आणि चित्रकला स्पर्धा व विविध कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.
राज्याच्या पर्यटन धोरणाच्या अनुषंगाने महिला सशक्तीकरण, युवा पर्यटन आणि साहसी पर्यटन यांना चालना देण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चासत्रे आयोजित केली जातील. सह्याद्रीतील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा वारसा, परिसरातील प्रेक्षणीय स्थळे आणि प्राचीन मंदिरांच्या भेटींच्या विशेष पर्यटन सहली हेही महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
सदर कार्यक्रम मा. श्री. ॲड. आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान), महाराष्ट्र राज्य आणि मा. श्री. शंभूराज देसाई, मंत्री (पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण विभाग), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून, तसेच मा. श्री. डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून सातारा, पुणे, मुंबई तसेच राज्यभरातील पर्यटक, साहित्यप्रेमी, सांस्कृतिक रसिक आणि निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अनोख्या सांस्कृतिक व पर्यटन पर्वाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

