मुंबई-अशोक खरात प्रकरणी कोणाला आरोपी करायचे आणि कोणाला अटक करायची हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीवर आहे. त्यांच्या पक्षातील अनेक लोक यामध्ये गुंतलेले आहेत. फडणवीसांनी या प्रकरणी कोणालाही पाठिशी घालू नये आणि राजकीय हेतू ठेवू नये, असे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटले आहे.
विकास लवांडे म्हणाले की, खरात प्रकरणी नेमलेली एसआयटी ही संथ गतीने काम करत आहे. त्यांनी केवळ अशोक खरात आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे. संस्थेचे बाकी विश्वस्त अजूनही मोकळेच आहेत. ते फरार होऊ शकतात. एसआयटीने अनेकांना या प्रकरणी आरोपी करणे गरजेचे आहे. माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये असे फोन खरातने तटकरेंना केले होते. तटकरे, चाकणकर यांना बोटाला जखम होते हे सगळं रॅकेट आहे. सिन्नरमध्ये हे सर्व सुरू आहे त्याबद्दल माणिकराव कोकाटेंना बरेच काही माहिती असणार आहेत. कोकाटेंनी सर्व माहिती समोर आणली पाहिजे.
रोहित पवारांचे ट्विट गंभीर
विकास लवांडे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी रोहित पवार यांनी केलेले ट्वि्ट पाहिले तर ते अतिशय गंभीर आहे. ते वाचल्यावर मन सुन्न झाले. गॅगस्टर जसे फुली मारत त्यांच्याविरोधातील एका-एका व्यक्तीला संपवत असतो. कर्मकांडाकडे महाराष्ट्र कधी झुकणार नाही. पण काही लोकांची त्यावर श्रद्धा असते. त्या लोकांनी अजित पवार यांच्या बंगल्यासमोरही काही काळ्या भावल्या टाकल्या होत्या. त्यातीलच काही लोकं इथे होते. कारण अशोक खरात यांच्या मंदिरात रुपाली चाकणकर या ट्रस्टी होत्या. त्यांच्यासोबत सुनील तटकरे तिथे वारंवार जात होते. पक्ष विलीनीकरणाच्या चर्चा त्याच काळात सुरू होत्या, हे सर्व सुरू असताना तिथे काय सुरू होते हे चाकणकरांना माहिती असेल त्यांना सहआरोपी केल्यानंतरच याबद्दल माहिती पुढे येईल. अजित पवार नको असलेले कोण लोकं तिथे जात होते याचा शोध घेणं गरजेचे आहे.
विकास लवांडे म्हणाले की, रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना सहआरोपी करावे यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवसांपूर्वीच मेल केला आहे. याचे कारण असे आहे की, चाकणकर या त्या संस्थेच्या विश्चस्त होत्या. अशोक खरात, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांनी अनेक आर्थिक व्यवहार सुद्धा केलेले आहेत. ज्यांची संपत्ती रायगडपासून अनेक ठिकाणी आहे. हवाला मार्फत काही व्यवहार झाले आहेत, ते पुढे येऊ शकतात. अनेक महिलांचे शोषण झाले आहे हे एकटा अशोक खरात करू शकतो का प्रश्न अनेकांना पडतो. यामागे एक टीम होतीच. काही पत्रकारांनी याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जात होता पण रुपाली चाकणकर यांच्यासह तटकरेंची तिथे उठबस असल्याने हे प्रकरण दाबण्यात येत होते, हे मोठे कांड आहे.
विकास लवांडे म्हणाले की, ताराराणीबद्दल वक्तव्य करणाऱ्या मुनींना भगवान महावीरांचे विचार समजलेले दिसत नाहीत. बुआबाबा खूप तयार होत आहे आणि ते काहीही बरळत असतात. महापुरुष हे समाज हितासाठी काम करत होते ते जातीयवादी नव्हते. अनेक जण जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचे काम करत असतात. सर्वच धर्मांत असे लोकं तयार झाले त्यांचा आम्ही निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष कसा चालवावा हा त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय आहे. रोहित पवारांनी अजित पवार यांच्या अपघाताबद्दल पुरावे दिले, म्हणून महायुतीच्या लोकांनी रोहित पवारांवर टीका केली. काही लोकांना अजित पवारांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता, म्हणून त्यांनी पक्षाची घटना बदलली. आणि सर्व अधिकार कार्यकारी अध्यक्षांना दिले.

