राज्यात 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई- आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. १० वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश आज (३१ मार्च) जारी करण्यात आले असून, यात अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी झालेली नियुक्ती सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. तर, आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांच्याकडे आता ‘आपत्ती व्यवस्थापन’ या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी.यांची वसई-विरार महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे .प्रेरणा देशभ्रतार यांची राज्य कर सहआयुक्त पदावरून आता मत्स्यव्यवसाय आयुक्त, मुंबई पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजेश देशमुख यांची राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
१९९५ च्या बॅचच्या सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो-३ प्रकल्पातील त्यांच्या कामाचा अनुभव आणि प्रशासकीय पकड पाहता, मुंबईच्या विकासकामांना गती देण्यासाठी सरकारने त्यांच्यावर हा विश्वास टाकल्याचे म्हटले जाते आहे. मुंबईच्या नागरी समस्या आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने त्यांची येथील कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.
२००५ च्या बॅचचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदावरून ‘आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन’ आणि वन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. सध्या राज्यात सुरू असलेला अवकाळी पावसाचा धुमाकूळ, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तींचे संकट पाहता, अत्यंत कार्यक्षम आणि धडाडीच्या अधिकाऱ्याची या पदावर गरज होती. मुंढे यांच्या अनुभवाचा फायदा राज्याला येणाऱ्या काळात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या नियोजनात मिळेल, असे कारण दिले जाते आहे.
लोकेश चंद्र मुख्यमंत्र्यांचे नवे अप्पर मुख्य सचिव
१९९३ च्या बॅचचे अधिकारी आणि ‘महावितरण’चे (MSEDCL) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची नियुक्ती आता मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्या जागेवर आता ते मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाची धुरा सांभाळतील.
विकासचंद्र रस्तोगी (१९९५): अप्पर मुख्य सचिव (कृषी) वरून आता वित्त विभागात (वित्तीय सुधारणा) अप्पर मुख्य सचिव म्हणून बदली.
विनिता वैद सिंघल (१९९६): प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन) वरून मृद व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती.
परिमल सिंग (२००४): ‘पोकरा’ प्रकल्पाचे संचालक आता कृषी विभागाचे सचिव असतील.
लाहू माळी: व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई.

