पुणे- ५०० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी २५० टनांच्या दोन स्वतंत्र निविदा काढा अशी मागणी महापालिका आयुक्त यांच्याकडे विरोधीपक्षनेते निलेश निकम यांनी केली आहे.
ते म्हणाले,’पुणे महानगरपालिकेद्वारे शहराच्या कचरा व्यवस्थापनासाठी ५०० टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र, शहराच्या भविष्यातील गरजा आणि तांत्रिक सुरक्षितता विचारात घेता आणि निविदेत पुरेशी स्पर्धा होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल करणे आवश्यक वाटते.
या प्रस्तावाबाबत खालील काही तांत्रिक व व्यावहारिक मुद्दे विचारात घ्यावेत अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली आहे पहा कोणते मुद्दे :
तांत्रिक जोखीम (Technical Risk): जर आपण ५०० टनांचा एकच प्रकल्प कार्यान्वित केला आणि काही तांत्रिक कारणास्तव तो बंद पडला, तर संपूर्ण ५०० टन कचऱ्याचा प्रश्न निर्माण होऊन शहरात कचरा साठण्याची शक्यता असते.
विकेंद्रीकरण आणि सातत्य: ५०० टनांऐवजी २५० टनांचे दोन स्वतंत्र प्रकल्प असल्यास, एका प्लांटमध्ये बिघाड झाला तरी दुसऱ्या प्लांटमध्ये प्रक्रिया सुरू राहील. यामुळे कचरा व्यवस्थापनात खंड पडणार नाही.
कार्यक्षमता आणि स्पर्धा: दोन वेगवेगळे ठेकेदार किंवा दोन स्वतंत्र प्लांट असल्यास कामात स्पर्धा राहील आणि व्यवस्थापन अधिक सुलभ होईल. तसेच, शहरातील वेगवेगळ्या भागात हे प्रकल्प उभारल्यास वाहतुकीचा खर्चही कमी होऊ शकतो.
निलेश निकम यांची मागणी:
पुणे शहराची स्वच्छता आणि आरोग्य अबाधित राखण्यासाठी, कृपया ५०० टनांची एक निविदा काढण्याऐवजी, २५० टनांच्या दोन निविदा मागवण्यात याव्यात. यामुळे शहराच्या कचरा प्रश्नावर एक कायमस्वरूपी आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होईल.
या विषयावर सकारात्मक विचार होऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी आम्हाला आशा आहे.

