पुणे-राज्यात आज पुणे व वाशिम जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी दुपारी अचानक झालेल्या या पावसामुळे उन्हामुळे हैरान झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पण त्याचवेळी शेतात उभ्या पिकांचे चांगलेच नुकसान झाले.
पुणे शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी अचानक पुणे शहर विशेषतः बाणेर, बालेवाडी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यात बाणेर परिसरात मोठी गारपीट झाली. यामुळे रस्त्यांवर गारांचा खच पडल्याचे दिसून आले. सखल भागांत पाणी साचल्याचेही दिसून आले. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे शहरात दुपारच्यावेळीच अंधार झाल्याचे चित्र होते. जवळपास अर्धा तास ही स्थिती होती. या अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. त्यांनी मिळेल तिथे आसरा घेऊन स्वतःचा पावसापासून बचाव केला.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात आजपासून 4 एप्रिलपर्यंत ढगाळी वातावरण व दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवे सत्र सुरू होणार आहे. त्यात प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो.
कधी-कुठे पावसाची शक्यता?
30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. पण या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान व वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण, दुपारनंतरचा वादळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस हवामानाच्या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, तसेच वादळी वारे, पाऊस व संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. मेघगर्जना व विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीजेचे खांब व विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन या प्रकरणी करण्यात येत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे बुधवार – गुरूवारी राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा 39 अंशावर पोहोचला होता. परभणी जिल्हा राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला असून बुधवारी येथे 39.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यानंतर सोलापूरमध्ये 39 अंश सेल्सिअस, तर जळगावमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. मराठवाड्यातील काही भागांत पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या आठवड्यात होणाऱ्या पावसामुळे हा पारा उतरण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

