पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश; कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांक
पुणे, दि.२८: महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मूल्यमापनात पुणे ग्रामीण पोलीस दलाने एकूण २०० पैकी १४५ गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला असून, कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पटकावला आहे.
मुंबई येथील सह्याद्री सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना सन्मानित करण्यात आले.
या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत पोलीस विभागातील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा यांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये डिजिटल प्रणालींचा वापर, ऑनलाइन सेवा, डेटा व्यवस्थापन, डॅशबोर्ड मॉनिटरिंग आणि तंत्रज्ञानाधारित निर्णयप्रक्रिया या घटकांवर विशेष भर देण्यात आला.
पुणे ग्रामीण पोलीस दलाने विविध डिजिटल प्रणालींची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. सीसीटी एनएस प्रणालीद्वारे एफआयआर नोंदणी, गुन्ह्यांची माहिती, तपास प्रगती आणि आरोपींची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली असून, सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रिअल-टाइम डेटा शेअरिंग सुलभ झाले आहे.
‘आपले सरकार’ पोर्टल अंतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाने नागरिकांसाठी १७ विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना घरबसल्या अर्ज करणे, प्रमाणपत्रे मिळवणे व विविध सेवा सहजपणे घेणे शक्य झाले आहे. तसेच ‘आपले सरकार ग्रीव्हन्स’ प्रणालीद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारी व अर्जांचा १४ दिवसांच्या आत निपटारा करण्यात येत आहे.
ई-ऑफिस प्रणालीमुळे कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली असून, सर्वाधिक प्रकरणांचा जलद निपटारा करण्यात पुणे ग्रामीण पोलीस दल अग्रस्थानी राहिले आहे. यामुळे कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणालीद्वारे नागरिकांना २४x७ तत्काळ माहिती, तक्रार नोंदणीची सुविधा आणि सेवा स्थिती तपासण्याची सोय उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे संवाद अधिक जलद व सुलभ झाला आहे.
इंटिग्रेटेड डॅशबोर्ड आणि अधिकृत वेबसाईट यांच्या माध्यमातून पुणे ग्रामीण पोलीस दलाची संपूर्ण माहिती, कामगिरी, गुन्हेगारी आकडेवारी आणि विविध सेवा नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पारदर्शकता अधिक बळकट झाली आहे.
जीआयएस प्रणालीअंतर्गत रात्रगस्त दरम्यान अधिकारी व अमलदारांचे अचूक लोकेशन ट्रॅक करणे शक्य झाले असून, नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत जवळचे पोलीस ठाणे सहज ओळखता येऊन तात्काळ मदत मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
तसेच, डायल 112 आपत्कालीन सेवा अंतर्गत उत्कृष्ट व भरिव कामगिरी करत कमी वेळेत नागरिकांना प्रतिसाद देण्यावर विशेष भर देण्यात आला असून, त्यामुळे आपत्कालीन सेवांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या “पोलीस पॅड” प्रणालीद्वारे ४ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अचूक मनुष्यबळ नियोजन करण्यात आले. या प्रणालीमुळे योग्य ठिकाणी योग्य पोलीस कर्मचारी तैनात करणे शक्य झाले असून, भीमा-कोरेगाव तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यांसारखे मोठे बंदोबस्त अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.
संदीप सिंह गिल, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली “६० Days” आणि “९० Days” पायलट प्रकल्प राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा, सेवा वितरणातील गती आणि अंतर्गत समन्वय सुधारण्यात महत्त्वाची प्रगती झाली आहे.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत, “तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम पोलीस प्रशासन उभारणे ही काळाची गरज असून, पुणे ग्रामीण पोलीस दल या दिशेने सातत्याने प्रयत्नशील राहील. ”
ही कामगिरी संपूर्ण पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी अभिमानास्पद असून, राज्यातील इतर पोलीस दलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे,असेही श्री. गिल म्हणाले.

