मुंबई- भारताच्या इंधन पुरवठ्यावर होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच देशात पुन्हा ‘लॉकडाऊन’ लागणार असल्याच्या अफवांनी नागरिक धास्तावले असून पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत सर्व संभ्रम दूर केला आहे. “देशात किंवा राज्यात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही; अशा खोट्या बातम्या पसरवणे हे देशद्रोहासारखेच आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांना फटकारले आहे. तसेच अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा सूचक इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचे पडसाद भारतीय बाजारपेठेत उमटत आहेत. एलपीजी सिलेंडर मिळण्यास होणारा विलंब यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. यावर मुख्यमंत्री म्हणाले, “देशात आणि राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा आहे. आपल्या देशाच्या डिप्लोमॅटिक रिलेशनशीपमुळे, पंतप्रधानांच्या नीतीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार नाही, त्याची काळजी घेतली जात आहे. अशा अफवा पसरवून जर कुणी गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर ते देशविरोधी काम आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “भविष्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा भासू नये, यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राज्यात गॅस सिलिंडरची टंचाई जाणवू नये म्हणून सगळीकडे पीएनजी कनेक्शन घेण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. पाईप गॅस लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याबाबतचा एक शासन निर्णय काढण्यात आला आहे. सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी अटी-शर्ती शिथील केलेल्या आहेत. या गॅस पाईप लान टाकल्या तर एलपीजीची गरज भासणार नाही.”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आजूबाजूच्या देशात लॉकडाऊन सुरू असताना आपल्या देशात मात्र त्यावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी त्याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर पडू दिला नाही. एलपीजी गॅसचाही कुठेही तुटवडा नाही. देशात जर कुणी अफवा पसरवून गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”
जागतिक घडामोडींमुळे इंधनाच्या किमतींवर किंवा पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो, मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. “नागरिकांनी कोणत्याही अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरून जाऊन साठा करू नये. प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे,” असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

