मुंबई, दि. २७ मार्च २०२६ : नवरगाव (जि. चंद्रपूर) येथील मथुराताई यांच्या पुनर्वसन प्रकरणाचा आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सविस्तर आढावा घेतला. ११ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रशासनाला दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी समाधानकारकपणे सुरू असल्याचे दिसून आले असून, उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाच्या पुनर्वसन प्रक्रियेत महत्त्वाची प्रगती झाली आहे. घरकुल योजनेअंतर्गत घराचे सुमारे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून सध्या प्लास्टरचे काम सुरू आहे. अंत्योदय योजनेद्वारे कुटुंबाला नियमित रेशन मिळत आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) चौकीदार म्हणून नोकरी देण्यात आली असून, आर्थिक स्थैर्यासाठी १० लाख रुपयांपैकी ७ लाख रुपयांची मुदत ठेव (FD) सुपूर्द करण्यात आली आहे.
डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने निवारा, रोजगार आणि आर्थिक मदत या तिन्ही स्तरांवर समन्वित कार्यवाही केली आहे.
ग्रामसेवक व स्थानिक प्रशासनामार्फत योजनांच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे. दरम्यान, उर्वरित बाबींबाबत उपसभापतींनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत.
आर्थिक मदतीतील शिल्लक ३ लाख रुपयांची रक्कम तत्काळ वितरित करावी, घराचे उर्वरित २० टक्के बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करून कुटुंबाला लवकरात लवकर घर हस्तांतरित करावे, तसेच आरोग्य, रोजगार व उपजीविका या सर्व बाबींचा समावेश असलेली सर्वसमावेशक पुनर्वसन योजना राबवावी, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, कार्यवाहीचा नियमित प्रगती अहवाल उपसभापती कार्यालयाला सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मथुरा ताई यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनाला गती मिळाली आहे

