पुणे -दिनांक २७ (प्रतिनिधी): आखाती देशात इस्राइल व अमेरिका यांनी इराण बरोबर जे युद्ध सुरू केल आहे, त्यामूळे महाराष्ट्रातील व्यापार,कृषी, आयात – निर्यात या सर्व व्यवसायांवर संकट ओढावले आहे. उद्योग क्षेत्रातील अनेक लोक याबाबत चर्चा करत आहेत. त्यामूळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व संस्था, या संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी, शिखर संस्था यांच्याबरोबर एक बैठक घ्यावी अशी मागणी आज राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ता सुनील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्याना ई मेल द्वारे पाठवले आहे.
सुनील माने यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे आपल्या देशाबरोबरच महाराष्ट्राचे ही उद्योग, व्यापार यांचे नुकसान होत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी इराणने रोखून धरल्यामुळे आखाती देशांकडून आपल्या देशाला होणारा पेट्रोल. डिझेल, गॅस यांचा पुरवठा कमी झाला आहे. याप्रमाणेच रासायनिक खतांचा सुद्धा पुरवठा कमी झाला आहे. या युद्धामुळे अन्नधान्याची आयात –निर्यात ठप्प झाली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. विजेसाठी लागणाऱ्या कोळश्याची सुद्धा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे ऊर्जा आणि वीजपुरवठा क्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम देशाबरोबर महाराष्ट्रावर सुद्धा होणार आहे. त्यामूळे युद्ध पुढे वाढले तर काय होईल याबाबत महाराष्ट्रातील उद्योग व व्यापार क्षेत्र चिंतेत आहे. उद्योग क्षेत्रातील अनेकजण याबाबत आमच्याशी चर्चा करत आहेत.
या युद्धामुळे आर्थिक चक्र थांबण्याचे संकेत आहेत. राज्यातून निर्यात होणाऱ्या मालाचे हजारो कंटेनर जे एन पी टी बंदरात अडकून पडले आहेत.यामुळे शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यातून मार्ग कसा काढायचा यासाठी संबंधित व्यापार- उद्योग संघटना तसेच पेट्रोलियम व इतर कंपन्यांचे आधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक आयोजित करावी. या बैठकीत युद्धामुळे महराष्ट्रात आता स्थिती काय आहे? शासकीय पातळीवर काय मदत केली जाऊ शकते याची माहिती दिली जावी, देशभरात एक कोटीच्यावर नोकऱ्यांना बाधा पोहचली आहे. महाराष्ट्रात अशी किती नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे याचीही चर्चा या बैठकीत व्हावी. तसेच या नुकसानीतून आपण कसे बाहेर पडू शकू याबद्दल सरकार तर्फे मार्गदर्शन करून काही योजना आणल्या पाहिजेत. या परिस्थितीमुळे राज्यातील जनता भयभीत झाली आहे. त्यामूळे दररोज या व्यापारावर लक्ष देण्यासाठी व राज्यातील जनतेची भीती कमी करण्यासाठी एक समिती नेमावी अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

