नवी दिल्ली : मलबार गोल्ड अॅंड डायमंड्स या जगातील पाचव्या क्रमांकाच्या मोठ्या ज्वेलरी रिटेल समूहाने आणि जबाबदार दागिन्यांच्या ब्रँडने २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठी २०० कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमांची घोषणा केली. या संदर्भातील एक कार्यक्रम नवी दिल्लीत डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे केंद्रिय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांनी देशभरातील ३३,००० मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला. या प्रसंगी मलबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद, समूहाच्या भारत संचालनाचे व्यवस्थापकीय संचालक ओ. अशर, कार्यकारी संचालक निषाद ए. के. आणि अब्दुल्ला इब्राहिम, ‘केरळ हाऊस’चे निवासी आयुक्त पुनीत कुमार, ‘प्रथम’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुक्मिणी बॅनर्जी तसेच ‘थनाल’चे अध्यक्ष डॉ. इद्रिस आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल याप्रसंगी म्हणाले, “मलबार चॅरिटेबल ट्रस्टचे उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या योजनेच्या विचाराशी सुसंगत आहेत. देशातील मुलींना सक्षम करण्याच्या उद्दिष्टाला ते पाठबळ देतात.”
पीयूष गोयल यांनी सांगितले, की मलबार गोल्ड अॅंड डायमंड्स या कंपनीने सीएसआरसाठी २०० कोटी रुपये देण्याचा घेतलेला निर्णय देशाच्या प्रगतीला अधिक बळ देईल. भारताच्या विकासाचा पाया लोकांच्या सक्षमीकरणात आहे, विशेषतः महिला आणि मुलींच्या प्रगतीत. शिक्षणाच्या माध्यमातून अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याच्या या कंपनीच्या प्रयत्नांचे कौतुक करायला हवे.
गोयल यांनी यावेळी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना मोठी स्वप्ने पाहायला, मर्यादांपलीकडे जाऊन विचार करायला आणि भारत देत असलेल्या मोठ्या संधींचा पूर्ण फायदा घ्यायला प्रोत्साहित केले. देशाच्या प्रगतीत तरुणांनी सक्रियपणे योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मलबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, “मनुष्यबळ विकास हा देशाच्या प्रगतीचा कणा आहे. दर्जेदार शिक्षणाद्वारे या मनुष्यबळाच्या प्रतिभेला योग्य दिशा देणे अत्यंत आवश्यक आहे. आमची शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळवण्यास मदत करते आणि त्यातून हे विद्यार्थी देशाच्या विकासात योगदान देऊ शकतात. समाजावर दीर्घकालीन आणि टिकाऊ सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सीएसआर उपक्रम राबवण्याबाबत मलबार समूह कटिबद्ध आहे.”
२०२६–२७ या आर्थिक वर्षात २०० कोटी रुपयांच्या सीएसआर प्रकल्पांची अंमलबजावणी देशातील १९ राज्यांमधील ३,००० हून अधिक ठिकाणी केली जाणार आहे. एकूण १५ महत्त्वाच्या उपक्रमांद्वारे हे काम होणार असून, याचा लाभ २ लाखांहून अधिक लोकांना होईल अशी अपेक्षा आहे.
यामध्ये शिक्षण क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी ११४ कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले असून, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी सूक्ष्म शिक्षण केंद्रे आणि मुलींसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना यांसारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. ‘भूकमुक्त जग’ या प्रकल्पांतर्गत अन्न वितरणासाठी ३० कोटी रुपये, तर आरोग्यसेवांसाठी १४.२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय, निराधार मातांसाठी ‘ग्रॅंडमा होम’सारख्या घरकुल प्रकल्पांसाठी २५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच इतर मानवतावादी उपक्रमांसाठी ६.८ कोटी रुपये आणि पर्यावरण संरक्षणासाठी १० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
मलबार समूहाच्या ३३व्या वर्धापनदिनानिमित्त, यंदा १८ राज्यांतील २८४ जिल्ह्यांमधील ३३,००० मुलींना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या उपक्रमाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत १,१५,००० हून अधिक मुलींना याचा लाभ झाला आहे. सर्व सीएसआर उपक्रम मलबार चॅरिटेबल ट्रस्टमार्फत राबवले जातात.
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘मलबार गोल्ड अॅंड डायमंड्स’ने प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्याने १७ राज्यांमध्ये १,५४३ लहान शिक्षण केंद्रे सुरू केली आहेत. यावर्षी ही संख्या वाढवून २,५०० करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ६४,००० वरून १ लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
‘भूकमुक्त जग’ या प्रकल्पांतर्गत भारत, झांबिया आणि इथिओपिया या देशांतील १,१५,००० लोकांना दररोज पौष्टिक अन्न दिले जाते. याशिवाय ‘ग्रॅंडमा होम’ प्रकल्पाद्वारे निराधार महिलांना मोफत निवास देऊन त्यांची देखभाल केली जाते, तसेच मलबार-थानल फार्मसीद्वारे गरजू लोकांना कमी दरात औषधे उपलब्ध करून दिली जातात.
‘मलबार गोल्ड अॅंड डायमंड्स’चे कामकाज ईएसजी (पर्यावरण, सामाजिक जबाबदारी आणि सुशासन) या तत्त्वांवर आधारित आहे. सुरुवातीपासूनच ही कंपनी आपल्या निव्वळ नफ्याच्या ५ टक्के रक्कम सीएसआर उपक्रमांसाठी खर्च करीत आहे. या उपक्रमांमध्ये महिला सक्षमीकरण, आरोग्यसेवा, शिक्षण आणि पर्यावरण संरक्षण यांवर विशेष भर दिला जातो. हे काम प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि थनाल यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने केले जाते.
या विविध उपक्रमांमधून भारतभरातील १८ लाखांहून अधिक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आला आहे.

