भाजपकडून मित्रांनाच संपवण्याचे कारस्थान:एकनाथ शिंदेंचे आदेशही अधिकारी जुमानत नाहीत; निवडणुका हायजॅक करून हुकूमशाहीकडे वाटचाल
पुणे-सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जी निवडणूक झाली त्यामध्ये शिवसेना नेते मंत्री शंभुराज देसाई यांना ज्या प्रकारे वागणूक दिली ती अतिशय चुकीची होती. मतदारांना मतदान करू दिले नाही. ही सर्व प्रक्रिया हायजॅक करण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. हे काही त्यांनी मनाने केलेले नाही, त्यांना कुणीतरी सांगितलेले असेल. भाजपने असे राजकारण करणे योग्य नाही, कारण शिवसेना त्यांचा मित्रपक्ष आहे. पण यांच्याकडे शत्रू ऐवजी मित्रांनाच संपवण्याचे काम सुरू आहे असे दिसून येत आहे, असे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, आम्ही करु तो कायदा अशा पद्धतीचे राजकारण सध्या सुरू आहे.महाराष्ट्रातील सर्वच निवडणुका हायजॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला वॉर्ड रचना, निवडणूक प्रक्रिया यातून दिसून आल्या आहेत. कुठला अधिकारी कुठली निवडणूक घेणार हे ठरवत लोकशाही संपवण्याचे काम भाजपने निवडणुकीच्या माध्यमातून केले आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल आदेश दिला होता की जा चुकला त्याला घरी बसवले पाहिजे, त्यांची चौकशी झाली पाहिजे.चूक नसेल तर पुन्हा घेता येईल. पण अर्धा तासात तो निर्णय राम शिंदेंनी तो निर्णय बदलला. एकनाथ शिंदेंनी सांगूनही ही अधिकाऱ्यांनी ऐकले नाही, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हतबलता येण्याचे काम झाले आहे. ही गोष्ट निंदनीय आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, या पद्धतीचे राजकारण करायचे असेल तर निवडणूक घेताच कशाला? काय करायचे ते तुम्हीच ठरवा.हुकुमशाहीकडे जाणाऱ्या राज्याला, देशाला कोण वाचवणार हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला आहे. हा देश लोकशाही मानणारा आहे. देशामध्ये गल्लोगल्ली विरोधकांना ठेचण्याचे काम सुरू आहे, हे सर्व देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. या सर्व प्रकरणाला तेच जबाबदार आहेत. त्यांनी पहिले
रवींद्र धंगेकर म्हणाले की, जयकुमार गोरे ज्या पद्धतीने पोलिसांची बाजू मांडत होते त्यातून त्यांना पाठिंबा देत आपली कामे करुण घेणे. त्यांना चाकोरीत आणत लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार होता. साताऱ्यातील त्या पोलिस अधिकाऱ्यांना घरी बसवले पाहिजे. तरच हे कायद्याचे राज्य म्हणता येईल. नाहीतर हुकुमशाही सुरू झालेली आहे. गल्लोबोळात सुद्धा हेच सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मुद्दाम त्रास देणं योग्य नाही. मित्र केवळ कामापुरता नसावा तो कायम असावा. निवडणूक आयोगाच्या फालतू लोकांसमोर जर नेत्यांना अशी वागणूक दिली जात असेल तर तो जनतेसमोर जाणार कसा? असा सवाल धंगेकरांनी केला आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, भाजपचा इतिहास पाहिला तर मित्रांनाच पहिले संपवते हे दिसून येते. हे नेते शिंदेंचे काही ऐकत नसतील तर आम्ही कार्यकर्ते कोणाकडे जाणार? हे राजकारण आता थांबवले पाहिजे. अशोक खरात प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याला कोणी मदत केली हे शोधले पाहिजे. यात कोणी उद्योगपती अडकले आहेत का? हे शोधले पाहिजे. तर अशोक खरातला भर चौकात फाशी दिली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.

