मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
पुणे, दि. 22: ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मिळणारे मार्गदर्शन केवळ मुलींसाठी कराटे प्रशिक्षण नसून एक स्वसंरक्षण, आत्मविश्वास व सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा उपक्रम म्हणून मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
सर परशुराम महाविद्यालय पुणे येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत आयोजित राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ .हेमंत वसेकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, संचालक योजना श्रीकृष्ण कुमार पाटील, एससीआरटी सहसंचालक तथा राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे राज्य समन्वयक डॉ.कमलादेवी आवटे, पुणे मनपा शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे उपाध्यक्ष अतुलजी तरवडे आदी उपस्थित होते .
श्री. भुसे म्हणाले, स्वसंरक्षण हे केवळ शारीरिक प्रशिक्षण नसून ते विद्यार्थिनींच्या आयुष्यातील एक महत्त्वाची शिस्त आहे. प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम झाले पाहिजे. शिक्षण म्हणजे केवळ चार भिंतींमध्ये मिळणारे शिक्षण नसून आयुष्यातील प्रत्येक संकटांना धैर्याने तोंड देणारे शिक्षण असावे, याच बाबीचा विचार करुन आजच्या युगात मुलींनी आत्मरक्षा, आत्मसंरक्षणाचे उत्तम धडे गिरवविण्याकरिता शालेय शिक्षण विभागाने ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम’ हे विशेष अभियान सुरू आहे.
राज्याच्या शाळांमधील इयत्ता 6 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी या शैक्षणिक वर्षांपासून पासून हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मार्शल आर्ट, माजी सैनिकांमार्फत प्रशिक्षण आणि योगा अशा विविध बाबींचा समावेश असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थिनींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. महिला सबलीकरण, आत्मसंरक्षण आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असणार आहे. प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर व सुरक्षित उभी राहण्यासाठी सर्व शाळांतील मुलींनी हे प्रशिक्षण घ्यावे. शिक्षणाबरोबर कला व क्रीडा उपक्रमाना प्राधान्य दिले जाईल. शाळेतील विद्यार्थिनींना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करणे हे आमचे प्राधान्य आहे, या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनीमध्ये मनोबल वाढेल असा विश्वास मंत्री श्री. भुसे यांनी व्यक्त केला.
श्रीमती नागपुरे म्हणाल्या, मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण व जीवन कौशल्य यासारख्या उपक्रम ही काळाची गरज आहे. तसेच हे एका दिवसाचे प्रशिक्षण नाही तर आयुष्यभरासाठीचे शिक्षण असावे असे मत व्यक्त केले. तसेच आपल्या मधील शक्ती पुन्हा एकदा जागृत करण्याची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी प्रशिक्षणामध्ये हभप अक्षय महाराज भोसले यांनी “जीवनकौशल्य ” विषयक तसेच आर्ट ऑफ लिविंग च्या मनीषा चंद्रा यांनी आत्मशांती व स्वनियंत्रण या विषयावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षक शेफुजी शौर्य भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण वर्गासाठी पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपा या दोन्ही महानगरपालिकेच्या जवळपास 416 पेक्षा जास्त शाळांनी आणि 12 हजारापेक्षा जास्त विद्यार्थिनी आणि शिक्षक यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
पुणे विभागाचे उपसंचालक गणपत मोरे, पुणे मनपा शिक्षणाधिकारी डॉ. सुनंदा ठुबे, शिक्षण सहसंचालक हरून आतार, पुणे विभागाच्या सहसंचालक डॉ .ज्योती परिहार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.विकास गरड, पुणे मनपा माध्यमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी आशा उबाळे, प्रशासनाधिकारी पिंपरी-चिंचवड मनपा संगीता बांगर, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक डॉ अरुण जाधव आदी उपस्थित होते.

