मुंबई-नाशिकमधील तथाकथित भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने आधीपासूनच लक्ष घातल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच या प्रकरणाची दखल घेतली होती. त्यांनी या गंभीर प्रकरणाची माहिती घेत पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकांनी यंत्रणा हलवली आणि नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईची तयारी सुरू झाली. त्यामुळे ही कारवाई अचानक नसून पूर्णपणे नियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व महत्त्वाचे पुरावे आधीच गोळा करण्यात आले होते. अशोक खरातविरोधातील व्हिडिओ क्लिप्स आणि इतर संवेदनशील माहिती पोलिसांनी आधीच ताब्यात घेतली होती. या पुराव्यांच्या आधारे कारवाई अधिक मजबूत करण्यात आली. त्यानंतरच पोलिसांना कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले. या सगळ्या प्रक्रियेमुळे आरोपीविरुद्ध ठोस केस तयार करण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका महिलेने अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वेग आला. गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अशोक खरातला पकडण्यासाठी सापळा रचला. अटकेची माहिती मिळताच तो पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वेगळाच डाव आखला. परिसरात चोरी झाल्याचा बनाव करून पोलिसांनी कारवाई सुरू केली, ज्यामुळे कोणालाही संशय आला नाही. त्यानंतर एक पथक घरात शिरले, तर दुसरे पथक बाहेर तैनात होते. खरात घरात असल्याची खात्री होताच त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

या संपूर्ण घटनेमुळे नाशिकसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. भोंदूगिरीच्या आडून सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाजातील अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची चर्चा जोर धरत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक केला असून, आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्रमक भूमिका घेत चाकणकरांनी पद सोडावे, असे म्हटले आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरून सवाल उपस्थित केला आहे. दुसरीकडे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाकणकरांची बाजू घेतल्याचे दिसत आहे, तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता अधिकच राजकीय रंग चढला आहे.

