हिंदू नववर्षानिमित्त समाजात एकोपा, जिव्हाळा आणि प्रगतीचे वातावरण निर्माण होण्याचे आवाहन
मुंबई, दि. १९ मार्च २०२६ : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक घरामध्ये गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता भारतातील विविध राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या पावन निमित्ताने सर्वांना वर्षभर यश, समृद्धी, उत्तम आरोग्य, मानसिक शांतता आणि अष्टलक्ष्मीची प्राप्ती होवो, अशा शुभेच्छा डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. तसेच समाजामध्ये एकोपा, जिव्हाळा, आरोग्यदायी व उत्साहवर्धक वातावरण आणि सकारात्मक विचारांची वृद्धी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विविध आव्हानांना सामोरे जात नागरिकांना सुखी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे सकारात्मक परिणाम देशावर दिसून येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कार्यरत असून सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्नांवर न्याय देण्यासोबतच अनेक महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेना नेत्या तसेच स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा या नात्याने डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

