पुणे :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरी देण्यात आली आहे. त्यांना वर्ग-२ पदाचे नियुक्तीपत्र मिळाले आहे. या निर्णयामुळे संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळणार असल्याचे म्हणले जात आहे. वडिलांच्या निधनानंतर आसावरी यांच्यासाठी शासकीय नोकरीची मागणी होत होती. त्या उच्चशिक्षित असून प्रशासनात काम करण्याची तयारी त्यांनी यापूर्वीच दर्शवली होती.
मध्यंतरी अद्याप नोकरी मिळाली नाही म्हणून जगदाळे कुटुंबाने सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हस्तक्षेप करत संबंधित अधिकाऱ्यांना लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या सूचनेनंतरच या प्रस्तावाला गती मिळाल्याचे सांगितले जात आहे.
आसावरी जगदाळे यांनी सुरुवातीला उच्च पदाची अपेक्षा व्यक्त केली होती. पण प्रशासकीय नियम आणि पात्रतेच्या चौकटीत राहूनच त्यांना वर्ग-२ पद देण्यात आले आहे. त्यामुळे “विशेष प्रकरण” असले तरी नियमांमध्ये बदल झाला नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, आता आसावरी जगदाळे लवकरच आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे. ही नियुक्ती एकीकडे मदतीचा हात म्हणून पाहिली जात असली, तरी दुसरीकडे प्रशासनातील नियम आणि संवेदनशीलतेचा समतोल कसा राखला जातो, याचाही हा एक महत्त्वाचा नमुना ठरत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या फोनवरुन आसावरी यांना शुभेच्छा
दरम्यान, आसावरी जगदाळे यांना नियुक्तीपत्र देत असताना अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आसावरी जगदाळे यांचे अभिनंदन केले. काही तांत्रिक कारणास्तव नियुक्ती रखडली होती. पण आपण एकाच दिवसात सर्व नियोजन केल्यानंतर विषय मार्गी लागला, असं मुख्यमंत्र्यांनी आसावरीच्या आईंना सांगितलं. यावेळी आसावरी जगदाळे यांच्या आईंनी मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानले.
“नमस्कार दादा, आज तुम्ही जास्त फॉलोअप घेतल्यामुळे माझ्या मुलीचं काम झालं आहे. खूप खूप धन्यवाद. माझी आता कुठलीही तक्रार नाही. मी आता खूप आनंदी आहे. तुमच्यामुळे हे सर्व झालं”, अशा शब्दांत आसावरी जगदाळे यांच्या आईंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानंतर आसावरी जगदाळे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोनवर आभार मानले.

