मुंबई, दि. १७ मार्च २०२६ : जळगावस्थित दै. लोकशाही माध्यम समूह आयोजित ‘चिवा उद्योजक स्नेह मेळा’ (चितोड वाणी) आणि ‘चिवा आयकॉन कॉफी टेबल पुस्तिका प्रकाशन सोहळा’ आज यशवंतराव चव्हाण सेंटर, रंगस्वर सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला नित्यसेवा प्रतिष्ठान, डोंबिवलीचे प्रतिनिधी, चिवास राष्ट्रीय मराठी अध्यक्ष अविनाश खारुळ, संपादक शांता वाणी, राजेश यावलकर, सचिन पैठणकर, उमेश वाणी, सिने अभिनेता प्रदीप वेलणकर तसेच उद्योजक दिपक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाजातील एकात्मता, परिश्रम आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. विविध क्षेत्रांतील लोकांशी सातत्याने संवाद साधणाऱ्या वाणी समाजाच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. “प्रत्येकाच्या यशामागे संघर्ष, कष्ट आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असतात. प्रगतीच्या वाटेवर अडथळे येतात, मात्र त्यावर मात करून पुढे जाणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.
समाजातील जात-पात विचारांपलीकडे जाऊन कार्य करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. “आपण कोणत्या समाजाचे आहोत यापेक्षा आपण काय काम करतो हे महत्त्वाचे आहे. आजच्या काळात ग्राहक, सहकारी किंवा नागरिक यांची जात पाहून काम करता येत नाही. सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
व्यापार आणि पर्यटन क्षेत्रातील वाढीबरोबरच निर्माण होणाऱ्या आव्हानांकडे लक्ष वेधताना त्यांनी उद्योजकांनी शासनाशी समन्वय साधण्याचे आवाहन केले. “तुमच्या अपेक्षा, समस्या या शासनाच्या योजनांशी जोडून तुम्ही कशा प्रकारे योगदान देऊ शकता याबाबत ठोस प्रस्ताव द्यावा, सरकारकडून शक्य तेवढे सहकार्य केले जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
समाजातील परस्पर सहकार्य आणि मदतीच्या भावनेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, “अडचणीच्या काळात आपल्या समाजातून मिळणारा मदतीचा हात माणसाला आयुष्यभर लक्षात राहतो. एकमेकांना साथ देणे हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे.”

