पुणे-पुण्यात सध्या ३३ किमी मेट्रो सुरू असून रोज अडीच लाख लोक तिचा वापर करत आहेत. गणपती उत्सवादरम्यान दररोज पावणेसहा लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. आता हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा मे महिन्यात (११ किमी) आणि दुसरा टप्पा जुलै महिन्यात (१२ किमी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रो भवनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, महापौर मंजुषा नागपुरे,सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, असीम गुप्ता आणि मेट्रोचे सीईओ श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोला आज एक नवीन घर मिळाले आहे. कामाला सुरुवात होण्यास काही उशीर झाला असला तरी, त्यानंतर देशात सर्वाधिक वेगाने पुणे मेट्रोचे काम झाले आहे. मेट्रो स्टेशन आणि इतर उपाययोजना चांगल्या प्रकारे उभारण्यात आल्या आहेत. मेट्रोच्या सुचारू कामकाजासाठी सुसज्ज मेट्रो भवन आवश्यक आहे.
पुण्याच्या वाहतुकीला गती देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पुणे हे आयटी हबनंतर आता जीसीसी (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स) क्रेझच्या दिशेने वाटचाल करत आहे, ज्यामुळे भविष्यात उच्च पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध होतील. शहरात लवकरच जमिनीखालील रस्ते नेटवर्कही तयार केले जाईल, ज्यामुळे पुणे वाहतूक कोंडीमुक्त शहर बनेल.
पुणे हे सर्वाधिक नागरीकरण दर असलेले शहर आहे. त्यामुळे सर्व कामे एकत्रितपणे करावी लागतील आणि त्यासाठी आवश्यक निधीही दिला जाईल. पुण्याला सक्षम वाहतूक व्यवस्था दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, पुणे मेट्रोचे काम मार्गी लावण्यासाठी अनेकांचा हातभार लागला आहे. दिवंगत अजित पवार यांनी पुण्याच्या प्रशासकीय वैभवात भर घालण्यासाठी विविध दर्जेदार इमारतींच्या उभारणीवर लक्ष केंद्रित केले होते. एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता आधुनिक मेट्रो शहर म्हणून ओळखले जाईल, असेही त्या म्हणाल्या.
पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली की, पुणे मेट्रोची स्थापना २०१५-१६ दरम्यान झाली. त्यानंतर विविध ठिकाणी कार्यालये स्थलांतरित करण्यात आली. अखेर आज शिवाजीनगर येथील सिव्हिल कोर्ट परिसरात हक्काचे ठिकाण मिळाले आहे.

