उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विविध मागण्या; शेतकरी महिलांना जमिनीच्या अधिकारासाठी शासन प्रयत्नशील
पुणे.दि.१४: महिला दिनाच्या औचित्याने संतुलन संस्था महाराष्ट्रतर्फे वाघोली येथे २८व्या ‘भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद’चे आयोजन करण्यात आले. या परिषदेला महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
डॉ. गोऱ्हे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांची सामाजिक सक्षमता पूर्वीपेक्षा वाढली आहे. ‘लाडक्या बहिणी’ योजनेअंतर्गत दिला जाणारा भत्ता महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहे. अनेक महिलांनी या योजनेचा योग्य वापर केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. अर्थसंकल्पात एकल महिलांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिलांच्या नावाने घर देण्याचा आणि आदिवासी जमिनीचे पट्टे पती-पत्नी दोघांच्या नावाने करण्याचा मुद्दा विधानभवनात उपस्थित झाला असून, सरकारने याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. एकटी पत्नी असल्यास तिच्या नावाने जमीन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात आणखी कोणते मुद्दे असावेत, याबाबत महिलांनी आपले मत कळवावे, असे आवाहन त्यांनी केले.
वृद्ध महिलांसाठी पेन्शन, गरिबांसाठी घरे उपलब्ध करणे, वृद्धपकाळीन योजनांचे एकत्रीकरण आदी मुद्द्यांवर शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल तसेच कष्टकरी आणि दगडखाण कामगार महिलांचा दक्षता समितीत समावेश करण्याचा विचार करण्यात येईल. दगडखाण कामगारांच्या कार्यक्रमांसाठी निशुल्क सभागृह उपलब्ध करून देण्यात येईल. बचत गटातील महिलांनी नवीन कर्जाऐवजी बँकेतील ठेवींवर कर्ज घेण्यास प्राधान्य द्यावे आणि व्याजाच्या आमिषाला बळी पडू नये, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. बांधकाम विकास महामंडळाची समिती नसेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा केली जाईल असे त्यांनी नमूद केले.
दगडखाण कामगार विकास परिषद महाराष्ट्र अध्यक्ष ऍड. बी. एम. रेगे यांनी, डॉ. गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनामुळे खाण कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळत असल्याचे सांगितले. त्या कष्टकरी महिलांचा खरा आवाज आहेत, असे त्यांनी नमूद केले.
या परिषदेत शेतकरी महिलांच्या नावे जमिनीवर प्रथम नोंदणी, शाळकरी मुलींसाठी मोफत बस पास व सायकल योजना, वृद्ध महिलांसाठी दरमहा १० हजार रुपये पेन्शन, दगडखाण कामगारांच्या गायरान जमिनीवर घरे, बांधकाम विकास महामंडळात प्रतिनिधित्व आदी मागण्यांसह ठराव जाहीर करण्यात आला. हा ठराव डॉ. गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमात ‘आपला विकास आपल्या हाती’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते झाले.
यावेळी संतुलन संस्थेच्या अध्यक्षा वंदना भुजबळ, परिषद अध्यक्षा ऍड. पल्लवी रेगे, एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे, नगरसेवक रामभाऊ दाभाडे, शैलेंद्र बनसोडे, हेमंत बत्ते, पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष प्रीती परदेशी, ऍड. अंजली बांदल, रिंकू मोरे, अनिता परदेशी आदी उपस्थित होते.

