चंद्रपूर-काही पक्ष विशेषतः काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांनी गॅस सिलिंडरसाठी रांगा लावाव्यात, असा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आपल्याला महिनाभर पुरेल इतका पुरवठा आधीच करण्यात आला आहे. आवश्यकतेप्रमाणे गॅस आपल्याकडे उपलब्ध आहे. मात्र देशात पॅनिक तयार करायचे, ही काँग्रेसची बुद्धी आहे आणि ही देशाला घातक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने, गॅस कंपनी यांनी सचिवांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की घरगुती गॅसचे कुठेही संकट नाही. जेवढे महिन्याला आपल्याला लागतात तेवढी डिलिव्हरी गॅसची दिलेली आहे. त्यामुळे कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. त्यामुळे विनाकारण रांगा लावण्याचेही कारण नाही. ऑनलाईन बुकिंग करता येते आणि लोकांना त्यानुसार गॅसचा पुरवठा देखील होत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
वास्तविक न्यू एरा क्लीनटेक इंटिग्रेटेड कोल गॅसीफिकेशन ॲण्ड कार्बन कॅप्चर प्रकल्प आणि ग्रेटा एनर्जीच्या गॅसीफिकेशन आधारित इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात रोजगार निर्मिती होणार असून हे दोन्ही प्रकल्प केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
गॅस पुरवठा करण्याची मर्यादा सरकारने आखून दिली
सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे. या प्रकरणी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर अंशतः निर्बंध लादण्यात आलेत. सरकारच्या निर्देशांनुसार, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक सेवांना 100 टक्के गॅस पुरवण्यात येईल. स्मशानभूमी, वृद्धाश्रम व अनाथाश्रमांनाही 100 टक्के गॅस पुरवठा करण्यात येईल. तर उपहारगृहे, संरक्षण क्षेत्र, शासकीय व सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलिस/तुरुंग यांना 70 टक्के गॅसचा पुरवठा केला जाईल. याशिवाय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, औषध उद्योग, बीज प्रक्रिया व मत्स्यपालन क्षेत्राला 50 टक्के गॅस पुरवठा करण्याची मर्यादा सरकारने आखून दिली आहे.

