ऊर्जा क्षेत्रातील योगदानासाठी ‘वूमन इन एनर्जी ॲन्ड युटिलिटीज’ पुरस्कार
मुंबई, दि. १३ मार्च २०२६: मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये आमूलाग्र व पर्यावरणपुरक बदल घडवून आणल्याच्या कामगिरीची दखल घेत अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांना ‘वुमन इन एनर्जी ॲन्ड युटिलिटीज’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘इंडिया स्मार्ट युटिलिटी विक २०२६’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत शुक्रवारी (दि. १३) त्यांचा सन्मान करण्यात आला.
इंडिया स्मार्ट ग्रिड फोरमच्या वतीने नवी दिल्ली येथे स्मार्ट इंडिया युटिलिटी विक-२०२६ अंतर्गत १२ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जगभरातील वीजतज्ज्ञ सहभागी झाले असून प्रामुख्याने विद्युत क्षेत्रातील आधुनिक व स्मार्ट तंत्रज्ञान, सौर ऊर्जा, हायटेक ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, ऊर्जा साठवण, पर्यावरण आदींवर सादरीकरण व चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन तयार केला आहे. यातील ऊर्जा परिवर्तनाद्वारे राज्याच्या विद्युत क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा सुरु आहेत. सर्व वर्गवारीतील ग्राहकांना मुबलक, स्वस्त व शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. तसेच विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक प्रगतीला वेग मिळाला आहे.
रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅनमध्ये हरित ऊर्जेवर अधिक भर देण्यात आला आहे. सन २०३० पर्यंत विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी तब्बल ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जेसह ४५ हजार मेगावॅट विजेची आणखी भर पडणार आहे. राज्यातील नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होणार आहे. सोबतच सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून सुमारे ७ लाखांवर रोजगार निर्माण होत आहेत. नियोजनानुसार पुढील पाच वर्षांत वीज खरेदीमध्ये ८२ हजार कोटी रुपयांची बचत होईल. परिणामी सन २०३० पर्यंत सर्वच वर्गवारीतील वीज दर कमी होण्यास सुरवात झाली आहे. तसेच महावितरणच्या वीज खरेदीमध्ये १० हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये १३ हजार ५०० कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने औद्योगिक व व्यावसायिक विजेचे दर स्वस्त होत जाणार आहेत.
शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी जगातील सर्वात मोठ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या विक्रेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांची ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०’ सुरु करण्यात आली. या योजनेतून १० लाख ९५ हजार आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतून ८ लाख ६५ हजार अशा एकूण १९ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे. देशात अग्रेसर ठरलेल्या या दोन्ही योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
विद्युत क्षेत्रातील नियोजनाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन इंडिया स्मार्ट ग्रिड फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांना ‘वुमन इन एनर्जी अॅण्ड युटिलिटीज’ पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्यावतीने महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. दत्तात्रेय पडळकर व मुख्य महाव्यवस्थापक (आयटी) श्री. अविनाश हावरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

