पुणे, दि. ११ – देशातील १६ वी जनगणना असलेल्या जनगणना २०२७ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी आवश्यक तयारी पूर्ण करून जनजागृती आणि समन्वय साधावा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिले.
१६ मे ते १५ जून या कालावधीत होणाऱ्या घरयादी व घरगणनेच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच पुणे जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिका आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जनगणना ही संविधानिक व कायदेशीर प्रक्रिया असून ती संविधानातील अनुच्छेद २४६ (केंद्रसूची) आणि जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत राबविण्यात येते. जनगणना २०२७ ही १८७२ पासूनची देशातील १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना आहे. या प्रक्रियेत प्रगणक आणि पर्यवेक्षक हे महत्त्वाचे आधारस्तंभ असून त्यांच्या माध्यमातून घराघरांतून अचूक माहिती संकलित केली जाणार आहे. जनगणनेतून मिळणारी माहिती शासनाच्या नियोजन प्रक्रियेसाठी, विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, संसाधनांचे योग्य वाटप तसेच मतदारसंघांचे परिसीमन यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे प्रत्येकाने जनगणना कार्यात सक्रिय सहभाग देऊन अचूक माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जनगणना २०२७ ही दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना (२०२६) केली जाईल. या टप्प्यात घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा, मालमत्ता आदी बाबींची माहिती संकलित करून पुढील लोकसंख्या गणनेसाठी आधारभूत चौकट तयार केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना (२०२७) करण्यात येणार असून ठराविक संदर्भ दिनांक व वेळेनुसार प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती नोंदविण्यात येईल.
यावेळी जनगणना प्रक्रियेत मोठा तांत्रिक बदल करण्यात आला असून “सेन्सस २०२७–एचएलओ” या मोबाईल अॅपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच प्रथमच स्व-गणना (सेल्फ एन्युमरेशन) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी स्व-गणना करून माहिती सादर केल्यास ती अंतिम करण्यापूर्वी प्रगणकांकडून पडताळणी केली जाणार आहे.
जनगणना प्रक्रियेबाबत सर्व विभागांनी समन्वय ठेवून आवश्यक मनुष्यबळ, प्रशिक्षण आणि जनजागृतीसाठी नियोजन करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिले.

