पुणे -राज्यातील काही नेते भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप येथील कार्यकर्ते करू लागले असून त्याबाबत कालच एक व्हिडीओ व्हायरल झाला .त्यानंतर आज आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड यांच्यावर भाजपच्या सहाय्यासाठी पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारीचे तिकीट विक्री करणे आणि जमीन बळकावणे, आर्थिक गैरव्यवहार करणे असे गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अमीर शेख यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पाठविलेल्या पत्रात केले असून छाजेड यांना तात्काळ निलंबित करून पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना ॲड. अभय छाजेड म्हणाले की, अमीर शेख यांनी आजपर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नाही. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी बेजबाबदार कामे करत संघटनेची वाट लावली आहे. त्यांना स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्याने ते आता बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांबाबत पुरावे देऊन ते सिद्ध केले पाहिजेत, केवळ हवेत आरोप करून प्रसिद्धी मिळवू नये, असे छाजेड यांनी म्हटले आहे.
ॲड. शेख यांनी पत्रात नमूद केले आहे की, ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत. त्यांनी नऊ वर्षे नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. पक्षातील निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ही तक्रार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
छाजेड यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप करताना शेख यांनी म्हटले आहे की, पुण्यातील कोथरूड येथील एका ज्येष्ठ नागरिकाची सुमारे ९० गुंठे जमीन बळकावून त्यावर बंगला आणि क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. तसेच, पुण्यात १०० एकरपेक्षा जास्त बेकायदेशीर जमिनीच्या व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केला.
याशिवाय, पुणे मनपा निवडणूक २०२६ मधील उमेदवारी वाटपात मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्ये निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील व्यक्तींना तिकीट देण्यात आले, असे शेख यांनी म्हटले आहे. राजू पवार आणि समाधान शिंदे यांची नावे त्यांनी पत्रात नमूद केली असून, हे दोघेही अधिकृतरीत्या काँग्रेसमध्ये दाखल नसतानाही त्यांना तिकीट देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
प्रभाग क्रमांक ३५ (सिंहगड रोड) मध्ये जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी सुचवलेल्या चार निष्ठावान कार्यकर्त्यांची नावे डावलून तिकीट एका अज्ञात व्यक्तीला विकल्याचा आरोप आहे. या व्यक्तीने उमेदवारी अर्जही भरला नसल्याचे शेख यांनी पत्रात नमूद केले. तसेच, प्रभाग क्रमांक २८ मध्ये एका बिगर काँग्रेस व्यक्तीला तिकीट देण्यात आले. या उमेदवाराने दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराकडून तीन लाख रुपये घेतल्यानंतर निवडणूक न लढवताच माघार घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ॲड. शेख यांनी या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून अभय छाजेड यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.


