पुणे : शहरामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर्सचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल्स बंद पडत आहेत, हजारोंचा रोजगार धोक्यात आला आहे, अशा स्थितीत सत्ताधारी भाजपने पुणेकरांना दिलासा देण्याऐवजी वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
महापालिकेतील पदाधिकारी आणि कमिट्यांच्या निवडणुका लढविण्यात भाजपचे नेते मश्गूल झाले आहेत. पुण्याचे मंत्री उदासीन आहेत. वास्तविक त्यांनी पुण्यात बैठका घेऊन गॅस सिलेंडर पुरवठ्याबाबत वस्तुस्थिती तातडीने सांगायला हवी होती. पुणेकरांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत, त्या दूर करण्याऐवजी पुण्यातील सर्व मंत्री प्रश्नापासून दूर पळ काढत आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शिक्षणा साठी विद्यार्थी पुण्यात वास्तव्यास आहेत . गॅस सिलेंडरच्या टंचाईने छोटी हॉटेल्स , स्नॅक्स सेंटर , खानावळी बंद पडण्याची भिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने गावाकडे परतावे लागेल. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी भाजपची आहे. ही जबाबदारीसुद्धा भाजपचे लहान मोठ नेते टाळत आहेत . हे चित्र संतापजनक आहे असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे .
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडावी आणि या हॉटेल व्यवसायाला एकदम दणका बसू नये, अशा पद्धतीचे नियोजन व्हावे, अशा मागणीचे निवेदन मोहन जोशी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना आज (बुधवारी) दिले.

