पुणे, दि. १० मार्च: जगामध्ये संपूर्ण जीव सृष्टीला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवेल अशी भयंकर युद्ध स्थिती निर्माण झाली आहे. आज गरज आहे ती परस्परांबद्दल जिव्हाळा, आत्मियता, प्रेम, संघ भावनेची आणि हे केवळ खेळाच्या भावनेतूच शक्य होऊ शकते. युद्धाच्या जागी खेळ आणि विनाशाच्या जागी विकास हा संदेशच कुस्तीच्या माध्यामातून दिला जाईल. हे मैदान जागतिक शांततेचा एक आखाडा आहे. येथे स्वराज्य आणि स्वराष्ट्राच्या मातीतील कुस्तीचा विजयी नाद घुमणार आहे. असे विचार विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड स्मृती प्रित्यर्थ लातूर येथील विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) च्या पवित्र यज्ञ भूमीवर विश्वातील एकमेव मानवतातीर्थ भवनाच्या विशाल प्रांगणात अभूतपूर्व राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा-२०२६ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलते होते.
यावेळी हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम, श्री.बंडातात्या पाटिल, श्री.बापूसाहेब मोरे, श्री.विष्णू जोशीलकर, रामेश्वर (रुई)चे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, काशीराम दा. कराड, आमदार रमेशअप्पा कराड, डॉ. हनुमंत कराड, श्री. राजेश कराड, श्री. ऋषिकेश कराड, प्रा.तेजस कराड, श्री. बाळासाहेब बडवे, श्री. सरकार निंबाळकर, डॉ. एस.एन. पठाण, डॉ. रत्नदीप जोशी , डॉ. महेश थोरवे व प्रा.विलास कथुरे उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, मऊ मेणाहूनि आम्ही विष्णूदास कठीण वज्रास भेदू ऐसे अशी परंपरा असलेल्या या गावात जागतिक स्तरावरील पैलवान येत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. खेळ परंपरेचा असून लोकांना जोडणारा असून भावी जीवनाला दिशा देणारा आहे. ही स्पर्धा १९ वर्षापासून सुरू आहे.
दिनानाथ सिंग म्हणाले, आधुनिक काळातही लाल मातीवर प्रेम करणारे डॉ. विश्वनाथ कराड हे खर्या अर्थाने कुस्ती जगविण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. डॉ. कराड हे पुनम का चाँद आहे. त्यांनी पैलवानांना जो आधार दिला त्यातून त्यांचे खेळाप्रती प्रेम दिसून येते. ही स्पर्धा सतत अशीच चालत राहावी यासाठी पुढची पिढी तयार आहे.
हभप बापूसाहेब मोरे म्हणाले, जीवनातील प्रत्येक गोष्टीतून आनंद घ्यावा हे डॉ. कराड यांच्याकडून शिकले पाहिजे. प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे व्यासपीठ उभे केले आहे.
बाळासाहेब बडवे म्हणाले, महाराष्ट्राच्या कुस्तीचे हे वैभव अजरामर रहाण्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड यांनी अद्वितीय कार्य केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले २५० पैलवान लाल मातीत उतरणार आहेत. उद्घाटनाची कुस्ती रामेश्वर येथील प्रसाद शिंदे व कोल्हापूर येथील प्रणव राख यांच्यात झाली.
कुस्ती स्पर्धेचे धावते वर्णन समालोचन बाबा निम्हण यांनी केले.
प्रा. विलास कथुरे यांनी प्रास्ताविकेत कुस्ती संदर्भातील माहिती दिली व आभार मानले.

