मुंबई-अमेरिका, इस्राएल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी विमानवाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक विविध देशांमध्ये अडकून पडले होते. अशाच परिस्थितीत मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार कुवेतमध्ये अडकला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर करून मुलाला सुरक्षित भारतात आणण्याची विनंती केली होती. या आवाहनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत संबंधित यंत्रणांना हालचाली करण्याचे निर्देश दिले. अखेर सर्वांच्या प्रयत्नांमुळे विशाखा सुभेदार यांचा मुलगा सुखरूप मुंबईत परतला आहे.
अभिनय सुभेदार लंडनला जाण्यासाठी प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान कुवेत येथे त्याचा ट्रान्झिट थांबा होता. मात्र त्याचवेळी इराणकडून कुवेतवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू झाल्याने परिस्थिती अचानक तणावपूर्ण बनली. सुरक्षेच्या कारणास्तव कुवेतचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आणि विमान कंपन्यांनी अनेक उड्डाणे अनिश्चित काळासाठी रद्द केली. त्यामुळे अभिनय सुभेदार आणि त्याच्यासह इतर काही मराठी नागरिक कुवेतमध्ये अडकून पडले. पुढे प्रवास करणे किंवा भारतात परत येणे शक्य नसल्याने सर्वजण युद्धजन्य वातावरणामुळे भीतीच्या छायेत होते. कुवेतच्या आकाशात ड्रोन इंटरसेप्शनसारख्या घटना दिसत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर वाटत होती.
या पार्श्वभूमीवर विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर करून मदतीची आर्त विनंती केली. त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज ठाकरे यांच्याकडे मुलाला सुरक्षित भारतात आणण्यासाठी मदत मागितली. या व्हिडीओनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विशाखा सुभेदार यांना फोन करून मुलाला सुरक्षित परत आणण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तातडीने कारवाई सुरू केली. मुख्यमंत्री कार्यालयाने वेगाने हालचाली करत विदेश मंत्रालयाशी संपर्क साधला आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले.
या प्रक्रियेत केंद्र सरकारच्या यंत्रणांनीही मदत केली. फडणवीस यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास सांगितले. दरम्यान कुवेतमध्ये अडकलेल्या नागरिकांना थेट भारतात आणणे शक्य नसल्याने त्यांना सौदी अरेबियातील रियाध मार्गे परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यासाठी व्हिसाचा अडथळा निर्माण झाला होता. यावेळी विदेश मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम महाजन यांनी पुढाकार घेत संबंधितांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केली. त्यामुळे अभिनय सुभेदारसह सुमारे 30 महाराष्ट्रीयन नागरिकांना कुवेतहून रियाधकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
यानंतर या सर्वांनी सुमारे 700 किलोमीटरचा जवळपास दहा तासांचा रस्ते प्रवास करून रियाध गाठले. तेथून भारतात परतण्यासाठी विमानप्रवासाची व्यवस्था करण्यात आली. नियोजनानुसार 9 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी रियाधहून मुंबईकडे जाणारे विमान उड्डाण केले. हे विमान 10 मार्चच्या पहाटे सुमारे 3 वाजता मुंबईत उतरले. या विमानातून अभिनय सुभेदारसह महाराष्ट्रातील जवळपास 30 नागरिक सुरक्षितपणे मायदेशी परतले. या संपूर्ण प्रक्रियेत कुवेतमधील भारतीय दूतावासानेही महत्त्वाची मदत केल्याची माहिती देण्यात आली आहे.

