मानवतातीर्थ भवन, रामेश्वर रुई येथे आयोजित राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा 2026 या निमित्ताने एक विशेष लेख
– डॉ रत्नदीप जोशी
रामेश्वर रुई येथील पवित्र यज्ञ भूमीवर, विश्वातील एकमेव मानवतातीर्थ भवनाच्या विशाल प्रांगणात राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धे एक अभूतपूर्व सोहळा रंगणार आहे. हा केवळ कुस्त्यांचा आखाडा नाही, तर सरस्वतीरत्न विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सरांच्या उदात्त प्रेरणेतून साकारलेला ‘ विश्वशांतीचा आविष्कार’ आहे.
संस्कारांची पावन भूमी: मानवतातीर्थ भवन
जिथे विज्ञानाची दृष्टी आणि अध्यात्माची सृष्टी एकत्र येते, त्या मानवतातीर्थ भवनाच्या भिंतींमधूनही आज राष्ट्रप्रेमाचे पडसाद उमटत आहेत. डॉ. विश्वनाथ कराड सरांनी मांडलेला ‘विश्वधर्माचा’ विचार हा केवळ ग्रंथात मर्यादित न राहता, तो आता मातीतील कुस्तीच्या माध्यमातून जनमानसात झिरपत आहे. हे भवन म्हणजे केवळ दगड-धोंड्यांची वास्तू नसून, ती मानवी मूल्यांचे संवर्धन करणारी एक जिवंत प्रयोगशाळा आहे.
युद्धाच्या सावटात शांतीचा हुंकार
आज जग जेव्हा बारुदाच्या ढिगाऱ्यावर बसले आहे, जिथे विनाशाची भाषा बोलली जात आहे, अशा काळात रामेश्वर रुईच्या मातीतून ‘शांतीचा संदेश’ दिला जात आहे. शस्त्राने मिळवलेला विजय हा तात्पुरता असतो, पण शास्त्र आणि कौशल्याने जिंकलेले मन अजरामर असते. या स्पर्धेचे मूळ सूत्र हेच आहे की, संघर्ष हा विनाशासाठी नसावा, तर तो स्वतःच्या मर्यादा ओलांडण्यासाठी असावा. रणांगणावरील रक्तापेक्षा, आखाड्यातील घाम हा अधिक पवित्र असतो, कारण तो शरीर आणि मनाला सुदृढ करतो.
आखाड्यातील थरार
या कुस्ती स्पर्धेचे वर्णन करताना शब्दांनाही नवे धुमारे फुटतात. जेव्हा दोन मल्ल समोरासमोर ठाकतात, तेव्हा ते केवळ दोन देह नसतात, तर ते दोन ‘निश्चयाचे महामेरू’ असतात. आखाड्यातील ती लाल माती म्हणजे जणू क्रांतीचे प्रतीकच वाटत आहे. मल्लांच्या अंगावर उडणारी माती पाहून असे भासते की, जणू धरणीमाताच आपल्या पुत्रांना आशीर्वादाचा टिळा लावत आहे. मानवता तीर्थभवनातील हे कुस्तीचे मैदान म्हणजे ‘जीवनाचे रणांगण’ आहे. इथे पडणे म्हणजे हार नाही, तर पुन्हा जोमाने उठण्याची तयारी आहे. आज या ‘मल्लांतील जोश, मातीची ओढ आणि मनगटातील मर्दुमकी’ या त्रिवेणी संगमाने प्रयागविश्व रामेश्वरचा आसमंत दुमदुमून गेला आहे.
डॉ. कराड सरांचा सुदृढ शरीरात सुदृढ मन हा नेहमीच आग्रह असतो. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ – म्हणजे शरीर हेच सर्व कर्तव्ये पार पाडण्याचे पहिले साधन आहे याचा ते कायम दाखला देतात. आखाड्यात उतरणारा मल्ल हा केवळ बलवान असून चालत नाही, तर तो चारित्र्यसंपन्न आणि संयमी असावा लागतो. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणाईला व्यसनांच्या गर्तेतून बाहेर काढून व्यायामाच्या ‘नंदवनात’ आणण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
विश्वधर्मी सरस्वती रत्न प्रा. डॉ. विश्वनाथ कराड: एक द्रष्टा नेतृत्व
ज्याप्रमाणे एखाद्या शिल्पकाराने दगडाला आकार देवून त्याचे मूर्तीत रूपांतर करावे, त्याप्रमाणे विश्वधर्मी डॉ. कराड सरांनी भारतीय संस्कृतीला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन हे भव्य आयोजन केले आहे. त्यांच्या प्रेरणेतून साकारलेली ही स्पर्धा म्हणजे ‘मानवतेची गुढी’ आहे. त्यांच्या मते, कुस्तीतील डावपेच हे कोणाला हरवण्यासाठी नसून, स्वतःमधील सुप्त गुणांना जागृत करण्यासाठी असावेत. मंगळवार दि. १० मार्च रोजी जेव्हा ढोल-ताशांच्या गजरात या स्पर्धांना सुरुवात होईल, तेव्हा रामेश्वर रुईचे आकाश ‘हर हर महादेव’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांनी भरून जाईल. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले ‘रुस्तम-ए-हिंद’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’चे स्वप्न पाहणारे तरुण मल्ल.
अंगात सळसळणारे रक्त, डोळ्यांत जिंकण्याची ईर्षा आणि मनात शांतीचा संकल्प: विश्वशांतीचा एक नवा सूर्योदय
रामेश्वर रुई येथील या कुस्ती स्पर्धा केवळ १० मार्चच्या दिवसापुरत्या मर्यादित नाहीत. हा एक विचार आहे जो प्रत्येक तरुणाच्या मनात रुजवायचा आहे. युद्धाच्या धामधुमीत शांतीचा मार्ग हा खेळाच्या मैदानातून जातो, हेच या स्पर्धेने सिद्ध केले आहे.
जेव्हा हे मल्ल त्या लाल मातीत एकमेकांना आलिंगन देतील, तेव्हा तो केवळ कुस्तीचा एक प्रकार नसेल, तर ती ‘जागतिक बंधुत्वाची’ एक मिठी असेल. डॉ. विश्वनाथ कराड सरांच्या स्वप्नातील बलशाली आणि शांतताप्रिय भारत घडवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
सर्वजण या, सारे सारे या, अवघे या! अनुभूती घ्या! विश्वगुरू भारतासाठी विश्वशांती द्वारे विकसित भारत हे ध्येय साध्य करण्यासाठी विश्वधर्मी सरस्वतीरत्न प्रा. डॉ विश्वनाथ कराड सर यांनी स्व कष्टातून निर्माण केलेल्या या विश्वशांती राजमार्गावरती चालू या आणि वसुधैव कुटुम्बकम या उदात्त प्रेरणेचे दर्शन देणाऱ्या भारतीय विचारांचे आणि दर्शनांचे पाईक बनून या मार्गावरती पुढे मार्गक्रमणा करूया!
आहे तितुके जतन करावे। पुढे आणिक मेळवावे।।
महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ।।

