पुणे- ‘एपस्टीन फाइल्स’ प्रकारणातील विविध कंगोरे समोर आल्यावर जग सुन्न झाले आहे. जगभरातील बलाढ्य देशातील तथाकथीत प्रतिष्ठीत व्यक्तींनी मुली, महिलांवर अत्याचार केले आहेत. बदलापूरमध्ये स्त्री बीजे विक्री होत असल्याचे समोर आले आहे. यात महिलांचे वर्गीकरण करुन स्त्री बीजांची किंमत ठरवण्यात आली आहे. हा बाजार स्त्रियांच्या देहा पर्यंत येणे हे खुप संतापजनक आहे. सध्या एकनिष्ठा, प्रमाणिकपणा आणि न्याय हे सर्व विकायला काढण्यात आली आहे अशी खंत कामगार नेत्या व लेखिका मुक्ता मनोहर यांनी व्यक्त केली.
महिलांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले पाहिजे तरच न्याय मिळेल, असेही यावेळी त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील गांधी भवन येथे रविवारी 29 वे ‘गांधी दर्शन शिबिरात ’ ‘जागतिक महिला दिन आणि स्त्रीमुक्ती चळवळ’ हा कार्यक्रम पार पडला. शिबिराच्या उद्घाटन सत्रात कामगार नेत्या व लेखिका मुक्ता मनोहर यांचे ‘जागतिक महिला दिन आणि स्त्रीमुक्ती चळवळ’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी लेखिका व कवयित्री डॉ. सिसिलिया कार्व्हालो, स्त्री आणि लिंगभाव अभ्यासक प्रा. संजयकुमार कांबळे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सदस्य सचिव अन्वर राजन, प्रविण सप्तर्षी, अंजली देशमुख, ज्ञानेश्वर मोळक, मधुकर गायकवाड आदींची उपस्थिती होती. मुक्ता मनोहर म्हणाल्या, रामरहीम आसाराम बापू यांच्या विरोधात काही महिला पुढे आल्याने अनेक महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना पुढे आल्या. त्यामुळे अन्याय, अत्याचार होत असल्यास महिलांनी पुढे आले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी झालेल्या ऐतिहासिक संघर्षाचा आढावा घेतला. समाजातील समानता, स्वातंत्र्य आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी स्त्री चळवळीचे महत्त्व अनेक उदाहरणासह स्पष्ट केले. अमरिकेत महिला त्यांच्या हक्कासाठी रस्यावर उतरल्या. अनेक वर्षे त्यांना संघर्ष करावा लागला, तेव्हा त्यांना न्याय मिळाला. महिलांनी उच्च शिक्षित होण्याबरोबर वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून जगले पाहिजे. त्यांनी आपले अज्ञान दूर करुन महिलांना जागृत केले पाहिजे. कंत्राटी कामगार महिलांना त्यांचे हक्काचा मोबदला मिळाला पाहिजे. नव्या युगात आपण बेजबाबदारपणे वागत आहोत. महिलांना असंख्य आव्हानाचा सामना करावा लागणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. 1857 ते 2024 पर्यंत झालेल्या महिलांच्या लढ्यांविषयी त्यांनी माहिती दिली.
लेखिका व कवयित्री डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी ‘स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू’ या विषयावर बोलताना त्यांच्या काव्य, नेतृत्व आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती दिली. त्या संविधान समितीतील १५ महिला सदस्यांपैकी एक होत्या. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नेत्या, प्रभावी वक्त्या आणि प्रतिभावान कवयित्री म्हणून ओळखल्या जाणार्या सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्य, स्त्रीसमानता आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या काव्यप्रतिभेमुळे त्यांना महात्मा गांधी यांनी गान कोकीळ अशी उपाधी त्यांनी दिली. यासह त्यांना त्यांच्या कार्यामुळे अनेक उपाध्या मिळाल्या आहेत.
त्यांनी लहानपणापासून साहित्य आणि सामाजिक प्रश्नांमध्ये रस दाखवला. त्यांच्या काव्यसंग्रहांनी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. अनेक भारतीय भाषांसह परेदशी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यामुळे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सरोजिनी नायडू स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाल्या. त्यांनी देशभर फिरून स्वातंत्र्य, स्त्रियांचे अधिकार आणि सामाजिक सुधारणा यासाठी जनजागृती केली मीठ सत्याग्रहासह विविध आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि स्वातंत्र्यलढ्यातील भूमिकेमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला.
समारोप सत्रात स्त्री आणि लिंगभाव अभ्यासक प्रा. संजयकुमार कांबळे यांनी ‘दक्षिण आशियातील पुरुषसत्तेचे स्वरूप : स्त्रीवादी आकलन’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, भारतातीलच नाही तर एकूण दक्षिण आशियातील स्त्री चळवळीत राज्य व्यवस्था आणि समाज व्यवस्थेला काही प्रश्न विचारले आहेत. पुरुषसत्ता, वसाहतवाद, भांडवलशाही आणि धर्मवाद हे स्त्रीवादापुढे आव्हान आहेत. जुने प्रश्न जसेच्या तसे आहेत आहेत आणि त्यात नवीन प्रश्नांची भर पडत आहे. हिंसेला विरोध करुन समता आणि न्यायाला महत्त्व द्यावे लागेल. आधुनिकतेसाठी प्रज्ञाशील आणि करुणा यावर आधारित भूमिका घ्यावी लागेल. दक्षिण आशियातील सामाजिक रचना, संस्कृती आणि परंपरांमधील पुरुषसत्ताकतेचे स्वरूप प्रा. कांबळे यांनी स्पष्ट केले.
सुरज कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि आभार मानले. सुत्रसंचालन अरुणाताई तिवारी यांनी केले. शिबिराला विविध क्षेत्रातील नागरिक, अभ्यासक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

