मध्यपूर्वेतील तणावावर व्यक्त केली चिंता
पुणे-इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. जागतिक स्तरावर वाढत्या तणावामुळे मानवतेला धोका निर्माण झाला असून, भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अण्णांनी या पत्राद्वारे केली आहे. गेल्या आठवडाभरात मध्यपूर्वेत तणाव कमालीचा वाढला असून, युद्धाचे ढग गडद झाले आहेत.
गेल्या आठवड्यापासून मध्यपूर्वेत तणाव कमालीचा वाढला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे. आठवडा उलटूनही हा संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. आता या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत उपरोक्त आवाहन केले आहे.
नेमके काय म्हणाले अण्णा हजारे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे यांनी जगातील सध्याच्या परिस्थितीवर सखोल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात, “सध्या जग अत्यंत चिंताजनक परिस्थितीतून जात आहे. विविध देशांमधील संघर्षामुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित बनले आहे. युद्धात निष्पाप महिला, मुले आणि कुटुंबांना सोसाव्या लागणाऱ्या यातना अत्यंत वेदनादायक आहेत. भारताची संस्कृती ही अहिंसा आणि शांततेची राहिली आहे. आपण नेहमीच जगाला संवादाचा मार्ग दाखवला आहे, त्यामुळे या कठीण काळात भारताने शांततेचा संदेश देणे गरजेचे आहे.”
शस्त्रे नव्हे, संवाद हवा
अण्णा हजारे यांनी पत्रात संवादाच्या महत्त्वावर भर दिला आहे. “आज जगाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची नाही, तर एकमेकांवरील विश्वासाची आणि संवादाची गरज आहे. युद्धामुळे केवळ विनाश होतो, मात्र संवादातूनच कायमस्वरूपी समाधान आणि स्थिरतेचा मार्ग निघू शकतो. भारताने एक जबाबदार आणि मोठी लोकशाही म्हणून जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही माझी नम्र प्रार्थना आहे,” असे त्यांनी नमूद केले.
“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक जागतिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. या संवेदनशील वेळी जर भारत माणुसकी आणि शांततेच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला, तर ते संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरेल,” अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केली आहे.


