केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना खास निमंत्रण
पुणे, दि. ६ मार्च : दौंड तालुक्यातील भांडगाव (यवत) येथील भक्तामर कलश तीर्थ येथे ११ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत ‘१००८ आदिजिन पंचमेरू मानस्तंभ पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भक्तामर कलश तीर्थ परिसरात कलशाकार मंदिर, नवग्रह रत्नमय प्रतिमा, नद्यावर्तात १०८ आदिनाथ जिन प्रतिमा, भक्तामर ध्यान केंद्र व हीलिंग सेंटर, भक्तामर शास्त्र मानस्तंभ, महाद्वार, नवधा भक्ति भोजनालय, संत निवास व यात्रेकरू विश्रामालय, आरोग्य धाम (अस्पताल) तसेच पूजन साहित्य उपलब्ध करून देणारे भांडार अशा विविध सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या महोत्सवाच्या यानिमित्ताने दिगंबर जैन राष्ट्रसंतांसह अनेक आचार्य, उपाध्याय, साधू-साध्वींचा दुर्मिळ संतसमागम येथे होणार आहे.
महोत्सवात १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता ‘भक्तामर ज्योतिष सम्मेलन’, १४ मार्च रोजी दुपारी १ वाजता ‘भक्तामर हीलर महोत्सव’ तसेच ४८००० मीटर हस्तलिखित भक्तामर वस्त्रांची विशेष झांकी सादर केली जाणार आहे. याशिवाय ‘जैन अल्पसंख्याक योजना – सरकारी योजना आणि संधी’ या विषयावर ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अमेरिकेतून पूर्वा सारंग शहा निर्मित भक्तामरवर चित्रफितीचे सादरीकरण होणार आहे.
या महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राजू शेट्टी, आमदार राहुल कुल यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष निमंत्रण देण्यात आल्याची माहितीही यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी पत्रकार परिषदेत श्री. किशोर जिनदत्त शहा (चंदूकाका सराफ), डॉ. सारंग शरद कुमार शहा, श्रीमती सुजाता निरंजन शहा, ॲड. डॉ. स्वप्निल महावीर शहा (पुणे), श्री मिलिंद फडे आणि श्री. चेतन शहा (बारामती), वीरकुमार शहा, सुरेंद्र बडजात्या उपस्थित होते. विश्व संत डॉ. आचार्य श्री प्रणाम सागर जी गुरुदेव यांच्या प्रेरणेने तसेच दीक्षा गुरु पूज्य आचार्य श्री पुष्पदंत सागर जी यांच्या आशीर्वादाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
आचार्य प्रणाम सागर जी हे गेल्या २९ वर्षांपासून अखंड भक्तामर साधनेत लीन असून त्यांच्या सान्निध्यात अनेक कुटुंबांना आध्यात्मिक शांती व तीर्थानुभूती लाभत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्यात प्रथमच जगतगुरु अष्टांग निमित्त ज्ञानी गणधराचार्य श्री कुंथु सागर जी, राष्ट्र संत आचार्य श्री गुणधरनंदी जी, पूज्य आचार्य श्री प्रसन्न ऋषि जी यांसह अनेक आचार्य, उपाध्याय, साधू-साध्वींचा दुर्मिळ संतसमागम होणार आहे.

