मुंबई- राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी ही यादी जाहीर केली. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च असून, 6 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंतची मुदत आहे.
विनोद तावडे महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. त्यांनी शालेय शिक्षण, उच्च आणि तांत्रिक शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास तसेच मराठी भाषा (भाषा) आणि संस्कृती खात्याचे मंत्रिपदही भूषविले आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांना पक्षसंघटनेत काम करण्याची संधी देण्यात आली. सध्या ते भाजपच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि 12 व्या आणि 13 व्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या समन्वय समितीचेही ते प्रमुख सदस्य होते. आता राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे ते पुन्हा एकदा संघटनात्मक कामातून मुख्य प्रवाहात आलेत.
आठवलेंना तिसऱ्यांदा संधी
रिपाइंचे रामदास आठवले यांना यंदा राज्यसभेची उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत साशंकता होती. त्यांची पत्ता कट होणार, अशी शक्यताही वर्तवली जात होती. मात्र, भाजपने आपल्या कोट्यातून सलग तिसऱ्यावेळेस आठवलेंना राज्यसभेची संधी दिलीय. विशेष म्हणजे रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवार 3 मार्च रोजी भेट घेतली होती. त्यांनी स्वतः एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत पुढील रणनीती, समन्वय आणि व्यापक राजकीय घडामोडींवर विचारविनिमय करण्यात आला.’
हिंगोली जिल्ह्यातले भाजप नेते व माजी आमदार रामराव वडकुते यांना यंदा भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केलीय. धनगर समाजाचे नेते ही वडकुते यांची ओळख. ते 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांना पक्षाने विधानसभेची उमेदवारीही दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. पुढे 2009 मध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. येथून युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजीव सातव यांची वर्णी लागली. त्यानंतर वडकुते यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेवर पाठवले. मात्र, 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये आले. आता त्यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिलीय.
आदिवासी नेत्या असणारे माया इवनाते या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय म्हणून गणल्या जातात. अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगावर त्यांनी सदस्य म्हणून काम केलेय. त्या नागपूरच्या माजी महापौर राहिल्या आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नागपूरचे आहेत. त्यामुळे नागपूरच्या लेकीला भाजपने राज्यसभेची संधी दिलीय.
महाराष्ट्रातून सात राज्यसभा खासदारांची मुदत संपत आहे. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्वतः शरद पवार आणि फौजिया खान, काँग्रेसमधून रजनी पाटील, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून प्रियांका चतुर्वेदी, भाजपकडून धैर्यशील पाटील आणि भागवत कराड, तर रिपाइंचे रामदास आठवले यांची राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपतेय. त्यामुळे या रिक्त जागांवर ही निवडणूक होतेय. यात रामदास आठवले यांना पु्न्हा एकदा भाजपच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आलीय.
महाराष्ट्रातील विधानसभेतले सध्याचे संख्याबळ पाहता, भाजपचे सर्वाधिक 4 उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.. एकनाथ शिंदेंची शिवसेना 1, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि महाविकास आघाडीची 1 जागा या ठिकाणी निवडून येऊ शकते. संख्याबळानुसार चौथी जागा निवडून आणण्यासाठी भाजपला कसरत करावी लागेल. राज्यातील 7 जागांसाठी प्रत्येकी 37 मतांचा कोटा निश्चित केला आहे.
भाजपला चौथ्या जागेसाठी 37 मते पूर्ण करताना काही अपक्ष आणि मित्रपक्षांच्या अतिरिक्त मतांची गरज भासेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या गणितात माहीर मानले जातात. यापूर्वीही त्यांनी कमी संख्याबळ असताना उमेदवार निवडून आणून विरोधकांना धक्का दिलाय. त्यामुळे यावेळीही अपक्ष आमदारांची मदत घेऊन भाजप आपली चौथी जागा सुरक्षित करतील, असे जाणकार सांगतायत.

