नवी दिल्ली, 3 मार्च 2026
मध्य पूर्वेतील युद्ध संघर्ष आणि बदलती जागतिक ऊर्जा परिस्थिती या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी प्रसारमाध्यमांना सद्यस्थितीत देशाच्या तयारीविषयी माहिती दिली.
जागतिक पातळीवर, भारत हा पेट्रोलियम उत्पादनांचा तिसरा सर्वात मोठा आयातदार, चौथा सर्वात मोठा रिफायनर आणि पाचवा सर्वात मोठा निर्यातदार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मध्य पूर्वेतील परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या अल्पकालीन व्यत्ययांना तोंड देण्यासाठी देशाकडे कच्च्या तेलाचा तसेच पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ यांसह महत्त्वाच्या पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
गेल्या काही वर्षात भारताने स्त्रोतांच्या वैविध्यकरणाद्वारे आपल्या लोकसंख्येसाठी ऊर्जेची उपलब्धता आणि किफायतशीरता, दोन्ही सुनिश्चित केली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. भारतीय ऊर्जा कंपन्यांना आता होर्मूझच्या सामुद्रधुनी मार्गे न येणारा ऊर्जा पुरवठाही उपलब्ध आहे. त्यामुळे होर्मूझच्या सामुद्रधुनीमार्गे येणाऱ्या पुरवठ्यात तात्पुरता अडथळा निर्माण झाल्यास ही पर्यायी जहाजे उपलब्ध होऊन पुरवठ्यात साहाय्यभूत ठरतील.
देशभरातील पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा आणि साठास्थिती, यावर अविरत देखरेख ठेवण्यासाठी मंत्रालयाने 24×7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. सध्या, सरकार साठ्याच्या बाबतीत बऱ्यापैकी समाधानी आहे. भारतीय ग्राहकांचे हित जपणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी सरकार सतर्क असून स्थिती अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी गरज भासल्यास टप्प्याटप्प्याने उपाययोजना केल्या जाऊ शकतात.

