पुणे- येथील एका नामांकीत व्यापाऱ्याच्या मुलाचं काही आरोपींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. आरोपी तरुणाला गाडीत घेऊन निघाले होते. पण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. नाकाबंदी लावली. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी जंग जंग पछाडलं. अखेर पोलिसांना या कारवाईत मोठं यश आलं आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तरुणाची सुखरुप सुटका केली. अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करणं हे पोलिसांसाठी सोपं नव्हतं. पण पोलिसांनी अतिशय संयमी पद्धतीने परिस्थिती हाताळत आरोपींना सळो की पळो करुन सोडलं. त्यामुळे तरुणाला गाडीत सोडून आरोपींना पलायन करावं लागलं. पोलिसांनी पीडित तरुणाला सुखरुप शोधून काढलं आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसरात मंगळवारी (3 मार्च) दुपारी घडलेल्या अपहरणाच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. स्थानिक नामांकित व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण करण्यात आले होते. मात्र, मात्र जेजुरी पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांतच युवकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी कापूरहोळ येथून एका कारमधून संबंधित युवकाला जबरदस्तीने घेऊन जाण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. युवकाच्या वडिलांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारेही मदतीसाठी संपर्क साधला.
माहिती मिळताच जेजुरी पोलीस आणि निरा पोलिसांनी जेऊर आणि नीरा परिसरात तात्काळ नाकाबंदी केली. संशयित वाहनाचा शोध सुरू असतानाच जेऊरकडून पिसुर्टीकडे जाणारी एक संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला असता, रस्ता अरुंद असल्याने ती कार ऊसाच्या शेतात जाऊन अडकली.
या गोंधळाचा फायदा घेत अपहरणकर्ते घटनास्थळावरून पसार झाले. मात्र पोलिसांनी तत्परतेने कारमधील युवकाची सुरक्षित सुटका केली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आणि तात्काळ नाकाबंदी केल्यामुळे मुलाची सुरक्षित सुटका शक्य झाली. आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी दीपक वाकचौरे यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस करत आहे.

