जे लोक देशाच्या विरोधकांना आणि आक्रमणकाऱ्यांना हिरो मानतील, त्यांना आम्ही सोडणार नाही…
मुंबई-“टिपू सुलतान चांगला होता की नाही हा नंतरचा प्रश्न आहे, पण त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे आणि त्याला शिवरायांपेक्षा मोठे दाखवण्याचा प्रयत्न करणे, हे आम्ही कदापि सहन करणार नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. गुरुवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी इतिहास, अर्थव्यवस्था, गुंतवणूक आणि रोजगार अशा विविध मुद्द्यांवर सरकारची बाजू भक्कमपणे मांडली.
गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या इतिहासाचे चुकीचे सादरीकरण केले गेल्याचा आरोप करत फडणवीस म्हणाले की, “दशकांपासून आपल्याला टिपू सुलतान हा महान राजा असल्याचे शिकवण्यात आले. मात्र, त्याने ७५ हजार हिंदू आणि ३३ हजार नायरांची केलेली क्रूर कत्तल हे कधी शिकवण्यात आले नाही. टिपू सुलतान इंग्रजांशी लढला हे खरे आहे, पण तो देशासाठी नाही तर स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी लढला, हे आपल्याला कधीच सांगण्यात आले नाही.”
आता खरा इतिहास समोर येत आहे. वर्षानुवर्षे देशात एनसीआरटीच्या पुस्तकात मोघली साम्राज्याला 17 पाने देण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी या पुस्तकात एकच परिच्छेद होता. आता मोदी सरकारने एनसीआरटीच्या पुस्तकात मराठ्यांच्या इतिहासाला 20 पानं दिली आहेत. योग्यवेळी नीट इतिहास शिकवला असता तर आज देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला हिरो म्हटले नसते. पण आपण खरा इतिहास कधीच शिकवला नाही. या देशात राष्ट्रभक्त मुसलमान आहेत. मला त्यांच्याविषयी कुठलाही आक्षेप नाही. पण जे लोक देशाच्या विरोधकांना आणि आक्रमणकाऱ्यांना हिरो मानतील, त्यांना आम्ही सोडणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

