VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे
बारामती – मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका असे म्हणत FIR का नोंदवीत नाहीत , कबुतरे चोरीला गेली म्हणून FIR दाखल केला जातो मग अजितदादा यांना न्याय द्यायला भाजपा विरोध करत आहे असे चित्र का समोर येते आहे .अजितदादांच्या अपघातामागे मोठ्या व्यक्तीचा हात आहे, VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे आहेत ,FIR दाखल करणे हा सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक माणसाला दिलेला अधिकार, माझी तक्रार खोटी ठरली तर शिक्षा भोगायला तयार आहे असे येथे आक्रमक झालेल्या रोहित पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर पवार कुटुंब आक्रमक झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, संबंधित कंपन्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. त्यांच्या भूमिकेला आता अजित पवार यांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवार यांनीही जोरदार पाठिंबा दिला आहे. दोघेही मिळून व्हीएसआर कंपनीविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी दोघेही बारामती पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मात्र, पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला नाही. त्यानंतर रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले. समर्थकांनीही जोरदार घोषणाबाजी केली.
त्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी रोहित पवार यांनी देशातील कोणत्याही नागरिकाला एफआरआय दाखल करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. एफआरआय दाखल करण्यास नकार देण्यात आल्याने रोहित पवार यांनी संबंधीत विमान कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणात दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.
रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त करत तपास यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी DGCA,सीआयडी आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत VSR कंपनीला वाचवण्याचा व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर रोहित पवार मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथेही गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचे सांगितले. एफआयआर नोंदवण्याच्या मागणीवरून पोलिस अधिकारी आणि पवार यांच्यात वाद झाला. माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, DGCAच्या परिपत्रकात VSR कंपनीच्या 25 पैकी 5 विमाने थांबवण्याचे आदेश दिल्याने संशय अधिक बळावला असून नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, पोलिसांवर कोणाचातरी दबाव असल्याचे जाणवत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

