पुणे, दि.२४: कृषी पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर कृषी पुरस्कार टॅब मध्ये उपलब्ध आहे. जास्तीत जास्त शेतकरी, संस्था, गटांनी पुरस्कारासाठीचे अर्ज ऑनलाईनरित्या सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार देण्यात येतात. कृषी पुरस्कारांसाठी सन २०२५ पासूनचे अर्ज ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे.
संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज सादर करता येणार आहे. ऑफलाईन चार प्रतींमधील प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारा वेळ व खर्च वाचून प्रस्ताव सादरीकरण जलदगतीने होणार आहे. एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा-पुन्हा देण्याची आवश्यकता नाही. अर्ज कुठल्या टप्प्यावर आहे याची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे. छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्ट खर्च कमी होणार असून आर्थिक भार कमी होणार आहे, असेही कृषी विभागाने कळविले आहे.

