पुणे, दि. 24: श्रीक्षेत्र देहू येथे ०३ ते ०५ मार्च २०२६ या कालावधीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक व वारकरी उपस्थित राहणार असल्याने इंद्रायणी नदीचे पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३३ (१)(ड) अन्वये प्राप्त अधिकारांनुसार खालील आदेश लागू केले आहेत.
देहू येथील इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवरील पाणी पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई राहील.नदीचे पाणी पिण्यास वापरू नये. भाविकांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळांचा वापर करावा. नदीपात्रात कपडे धुणे किंवा पाणी दूषित होईल असे कोणतेही कृत्य करू नये.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

