पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे, असे आणि त्यास पूरक गुन्हे करणाऱ्या बुधवारातील स्थानिक टोळीचा पर्दाफाश झाला असून या टोळीच्या डोक्यावर कोणाचा हात आहे,त्यांचे भारताबाहेर कोणत्या गुन्हेगारांशी कसे व्यवहार होतात,बोगस आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर बनावट भारतीय ओळखपत्रे कुठे, कशी बनविली जातात ,त्यामागे कोणी सूत्रधार आहे काय? या प्रश्नांची उकल पुणे पोलिसांनी सुरू केली आहे.
पोलिसांनी सांगितले की , बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठी कारवाई केली. या कारवाईत 22 महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी 11 जणी बांगलादेशी नागरिक असल्याचे तपासात समोर आले.यापूर्वी देखील अशा प्रकारचे दोन छापे टाकण्यात आले होते त्यामध्येही 10 बांगलादेशी नागरिक सापडले.
बांगलादेशी महिलांकडे बोगस आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर बनावट भारतीय ओळखपत्रे आढळली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात मानव तस्करी, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात या बांगलादेशी महिला पुण्यामध्ये कशा पद्धतीने दाखल होतात याबाबत पडलेला प्रश्न मागचे गुढ रहस्य आता पोलिसांनी उघड केले असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व रॅकेटच्या मागे बाबू भैया उर्फ पापा शेख हा व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. बाबू भैया उर्फ पापा शेख कोण?
पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार पापा शेख उर्फ बाबू भैया आहे. तो गेल्या 20 वर्षांपासून बुधवार पेठ परिसरात सक्रिय आहे. सुरुवातीला एका हॉटेलमध्ये छोटी-मोठी कामे करणारा हा व्यक्ती हळूहळू या क्षेत्रातील वेश्याव्यवसायाच्या बारकाव्यांशी परिचित झाला. त्याने कोलकाता मार्गे बांगलादेशमधून महिलांना पुण्यात आणण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून मोठी कमाई सुरू केली.
पापा शेखचे तीन विवाह झाले असून, त्यापैकी एक पत्नी बांगलादेशी आहे. त्याच्या तिन्ही पत्नी बुधवार पेठेतील एका भागात वर्चस्व राखून आहेत आणि त्या महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतात. एखादी महिला पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मारहाण करण्यात येते, अशी माहिती आहे. पापा शेखवर यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात गुन्हा दाखल असून, तो सध्या फरार आहे.
या प्रकरणी पापा शेखसह सुमित्रा कांबळे, राजेश कलीमनी, रणजीत पात्रा आणि रूपा शेख यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण टोळी एकत्रितपणे हे रॅकेट चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपींनी महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिलाई काम मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून, पैशाचे लालूच किंवा जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलले. कमाईतील मोठा हिस्सा स्वतःकडे ठेवला जात असे.
फरासखाना आणि खडक पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत ताब्यात घेण्यात आलेल्या 11 बांगलादेशी महिलांना लवकरच बांगलादेशला डेपोर्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी या रॅकेटच्या इतर दलालांची आणि बांगलादेश सीमेवर बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.
बुधवार पेठ परिसरात अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही वर्षांत वाढल्या असून, पोलिसांनी अवैध वास्तव्य आणि मानव तस्करीला आळा घालण्यासाठी सातत्याने मोहीम राबवली आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा शहरातील वेश्याव्यवसाय आणि परदेशी महिलांच्या तस्करीच्या मुद्द्या समोर आला आहे.

