देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ प्रदर्शन
डब्ल्यूपीयूत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वीं जयंती साजरी
पुणे, दि. १९ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याण केंद्रीत सुशासन, न्यायनिष्ठ प्रशासन आणि स्वराज्याची अढळ निष्ठा याचा केवळ उपदेश केला नाही, तर आपल्या कृतीतून त्यांचा आदर्श समाजासमोर ठेवला, म्हणून पावणेचारशे वर्षानंतर ही त्यांच्या विचारांची ज्वाला विझलेली नाही. उलट ती आजच्या पिढीच्या रक्तात आत्मसन्मान, संघर्षशीलता आणि राष्ट्र निष्ठेचे स्फूरण निर्माण करत आहेत. काळ बदलला तरीही शिवाजी महाराजांचा गौरवशाली वैचारिक वारसा आजही तितकाच जिवंत तेजस्वी आणि जाज्वल्य आहे. अशी भावना एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये शिकणार्या परराज्यातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने विनम्र कृतज्ञतेचा मानाचा मुजरा करुन त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.
शिवाजी महाराजांचे मोठेपण, कर्तृत्व एका देशापुरते किंवा राज्यापुरतेच मर्यादित नाही, तर ते वैश्विक पातळीवरील आहे. त्यांचा हाच जीवन संदेश विद्यार्थ्यांना कळावा या उद्देशाने एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात देशात प्रथमच अनोखा उपक्रम राबविण्यात आला. विद्यापीठातील २८० क्लास रुममध्ये इतिहास अभ्यासकांनी ९० मिनीटे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मांडला. प्रत्येकी ५-५ विद्यार्थ्यांनी ‘आजच्या समकालीन काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्य, निती व गुणांची कालातीत प्रासंगिकता’ या विषयावर विचार मांडले.
तसेच यावर्षी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मध्ये १२ ऐतिहासिक किल्ल्यांची सखोल माहिती देणारे प्रदर्शन, रक्तदान शिबिर (शेकडो विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.)े आणि महाराजांवर प्रकाशित ग्रंथ प्रदर्शनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शुभआर्शीवादाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, पीस स्टडीजचे डॉ. मिलिंद पात्रे, डॉ. हितेश जोशी, आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, न्यायव्यवस्था, प्रशासन व्यवस्था, कृषीनिती अर्थनीती, शिवकालीन सागरी सामर्थ्य, शैर्य, धैर्य आणि चातुर्थ, लोकाभिमुख ध्येय धोरणे, भविष्यवेधी विकासदृष्टी, पर्यावरणपूरक विकासाचा वस्तूपाठ व अस्मितेचा वारसा जपणे, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या मनात धैर्य, शैर्य, आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्योत पेटविणे. यांसारख्या मुद्यांवर विचार मांडण्यात आले.
तसेच तनिष्का पवार, प्रसाद शिंदे आणि शंभुराजे नितीन बानुगडे-पाटील या विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवन चरित्रावर विचार मांडले.
या वेळी प्रताप पुंडे, गौरंग माने, हर्षल दुधाळ, राजस शिंदे, प्रथमेश राऊत, पर्णिका तिवारी आणि निरंजन मानकर या स्टूडन्ट कॉन्सिलच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी सक्रीय सहभाग घेतला होता.

