भारताच्या इतिहासात धर्मस्वातंत्र्य, मानवी मूल्ये आणि सर्वधर्मसमभाव यांसाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागांमध्ये गुरु तेग बहादुर यांचे बलिदान अग्रक्रमाने स्मरणात राहते. त्यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आणि संदेशाचा स्मरणोत्सव देशभर साजरा करण्यात येत आहे.
सन १६७५ च्या सुमारास तत्कालीन परिस्थितीत काही भागांमध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला होता. अशा वेळी पीडित घटकांनी संरक्षण व मार्गदर्शनासाठी गुरु तेग बहादुर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित न राहता, प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार आहे, हा मूलभूत संदेश दिला. धर्मस्वातंत्र्याचे रक्षण हीच खरी मानवसेवा आहे, या भूमिकेतून त्यांनी अन्यायासमोर न झुकता तत्त्वनिष्ठ भूमिका घेतली.
दिल्ली येथे त्यांना अटक करून धर्मांतराचा दबाव टाकण्यात आला; परंतु त्यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता शांत, संयमी आणि धैर्यपूर्ण भूमिका कायम ठेवली. १९ नोव्हेंबर १६७५ रोजी त्यांना सार्वजनिकरीत्या शहीद करण्यात आले. हे बलिदान केवळ एका समुदायासाठी नव्हे, तर सर्वांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले महान योगदान म्हणून इतिहासात नोंदले गेले आहे. त्यामुळेच त्यांना “हिंद दी चादर” — म्हणजेच भारताच्या संरक्षणाची चादर — अशी गौरवपूर्ण उपाधी लाभली.
त्यांच्या सोबत भाई मती दास, भाई सती दास आणि भाई दयाला यांनीही अद्वितीय धैर्य दाखवत सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या त्यागामुळे मानवाधिकार, श्रद्धेचे स्वातंत्र्य आणि नैतिक धैर्य यांचे महत्त्व अधोरेखित झाले.
यानंतर गुरु गोविंद सिंह यांनी धर्म, शौर्य आणि संघटन यांचा संदेश अधिक बळकट केला. त्यांच्या चार साहिबजाद्यांचेही बलिदान भारतीय इतिहासातील प्रेरणादायी अध्याय मानले जाते. या घटनांनी अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि मूल्यांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना दिली.
गुरु तेग बहादुर यांच्या शहीदीच्या स्मरणार्थ देशातील विविध गुरुद्वारांमध्ये कीर्तन, प्रवचन, सामुदायिक सेवा उपक्रम व आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. पुणे येथील गुरुद्वारा गुरु नानक दरबार, कॅम्प तसेच इतर गुरुद्वारा समित्यांच्या वतीनेही शहीदी दिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्र तपासणी तसेच महिलांसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करून समाजोपयोगी कार्य करण्यात आले असून नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबच्या जीवनावर आधारित एक लाख पुस्तिका मोफत वितरण करण्यात आल्या आहेत.
३५० व्या शहीदी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवी मुंबई येथे दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी “हिंद-दी-चादर” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून गुरु तेग बहादुर यांचे त्याग, शौर्य आणि मानवतेचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे.
गुरु तेग बहादुर यांचे जीवन आपल्याला सांगते की, कोणत्याही परिस्थितीत मानवी मूल्ये, सहिष्णुता आणि परस्पर आदर या तत्त्वांचा त्याग करू नये. धर्मस्वातंत्र्य आणि सामाजिक सलोखा यांसाठी दिलेले त्यांचे बलिदान भारतीय संस्कृतीतील सहअस्तित्वाच्या परंपरेचे तेजस्वी प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहील.
चरणजितसिंग साहनी: ‘हिंद-दी-चादर’कार्यक्रम राज्यस्तरीय समन्वय समितीचे अशासकीय सदस्य तथा अध्यक्ष, गुरुद्वारा गुरुनानक दरबार, कॅम्प, पुणे
संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

