मुंबई- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्यांवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानाला नायक आणि महान योद्धा मानले जाते. अशा देशासोबत भारत क्रिकेट खेळत असेल, तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपने त्याचाही निषेध केला पाहिजे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेटचा धिक्कार करतो, असे फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी सांगायला पाहिजे पण ते तसे म्हणणार नाही ते ढोंगी आहेत.
संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानाचे पुतळे आहेत आणि शालेय अभ्यासक्रमातही त्याचा समावेश आहे. मग त्याला नायक मानणाऱ्या देशासोबत भारत क्रिकेट खेळतोच कसा? फडणवीस आणि भाजपची राष्ट्रभक्तीची उर्मी उचंबळून वर आली पाहिजे. आम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार नाही, असे ठामपणे त्यांनी जाहीर करावे. मात्र भाजप तसे करणार नाही, कारण त्यांची भूमिका ढोंगी आहे, अशी टीका त्यांनी केली.
भारत–पाकिस्तान सामन्यांवर हजारो कोटींची सट्टेबाजी होत असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला. मागील सामन्यातून सट्ट्याच्या माध्यमातून पाकिस्तानला तब्बल 25 हजार कोटी रुपये मिळाल्याचा दावा त्यांनी केला. हा पैसा पुलवामा आणि पहलगामसारख्या दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरला जातो, असेही ते म्हणाले. या व्यवहारातील काही हिस्सा सरकारमधील काही लोकांनाही मिळतो, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

