नवी दिल्ली / पुणे : “सहकाराच्या माध्यमातून देशात ‘श्वेत क्रांती २.०’द्वारे देशातील दुग्ध क्षेत्रात मोठे परिवर्तन घडणार आहे. या योजनेअंतर्गत देशात ७५ हजार नव्या बहुउद्देशीय सहकारी दुग्ध संस्था (एम-पॅक्स) स्थापन करण्यात येणार आहेत; तर महाराष्ट्रात २०२९ पर्यंत जवळपास अडीच हजार नव्या दूध सहकारी समित्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे,” अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत दिली.
खासदार सीमा द्विवेदी यांनी विचारलेल्या पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी या योजनेचा आराखडा व प्रगती सादर केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देईल. त्यातून रोजगार-व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, शेतकरी व महिला आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील,” असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ”श्वेत क्रांती २.०’ देशाची दूध उत्पादन क्षमता दररोज ६६० लाख किलोग्रामवरून एक हजार लाख किलोग्रामपर्यंत वाढविण्यावर सक्रिय काम केले जात आहे. देशात आतापर्यंत २२ हजार बहुउद्देशीय सहकारी दुग्ध संस्था स्थापन झाल्या आहेत. त्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत असंघटित क्षेत्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करून दूधाचा योग्य दर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या योजनेत महिला सक्षमीकरणावर विशेष भर आहे. प्रारूप उपविधींमध्ये बदल करून सहकारी संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत महिला व अनुसूचित-जाती जमातीच्या घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यात आले आहे.”
महाराष्ट्रासाठी विशेष तरतूद
“राज्यात सध्या १२ हजार ६०० दूध सहकारी समित्या कार्यरत आहेत. येत्या चार वर्षांत अडीच हजार नव्या समित्या स्थापन करण्यात येतील, तसेच ४ हजार २०० कार्यरत समित्यांचे सक्षमीकरण केले जाईल. याशिवाय देशातील सर्व राज्यांमध्ये नव्या दूध सहकारी समित्या स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे,” असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
दूध संस्थांना मिळणार अर्थसाह्य
“नॅशनल प्रोग्राम फॉर डेअरी डेव्हलपमेंट (NPDD) अंतर्गत नव्या व सध्या कार्यरत असलेल्या सहकारी संस्था व समित्यांना दूध संकलन व परीक्षणासाठी उपयुक्त यंत्रसामग्री व उपकरणे देण्यात येत आहेत. त्यासाठी जवळपास एक लाख ८६ हजार रुपयांचे अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येत आहे,” असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
“भारतीय शेतकऱ्यांच्या अपार कष्टामुळेच भारत जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश झाला आहे. शेती क्षेत्राच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) पशुधनाचा वाटा २५ टक्के असून, ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेतून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.”. :केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

