मुंबई, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६
बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या महायुतीचं सरकार आल्यानंतर आज महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या श्रीमती रितू तावडे विराजमान झाल्या. तर उपमहापौरपदी शिवसेनाच्या श्री संजय घाडी यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाचा पदभार श्रीमती रितू तावडे आणि श्री. संजय घाडी यांनी स्वीकारला. यावेळी सभागृहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष व आमदार राहुल नार्वेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राजहंस सिंह, प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, भाजप आमदार पराग अळवणी, योगेश सागर, संजय उपाध्याय, श्रीमती मनीषा चौधरी, श्रीमती विद्या ठाकूर, भाजप गटनेते गणेश खणकर, भाजप सरचिटणीस राजेश शिरवाडकर, श्रीमती श्वेता परुळकर तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.

मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांचे अभिनंदन करत त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रितू तावडे यांच्या रुपाने मुंबई महानगरपालिकेत ४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर विराजमान झाला आहे. तसेच त्या भाजपाच्या पहिल्या महिला महापौरही ठरल्या आहेत. रितू तावडे या घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक १३२ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. याशिवाय त्यांनी याआधी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. रितू तावडे यांनी महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या सभागृहाचं काम मी आज पहिल्यांदाच पाहिलं. मला अतिशय आनंद आहे की आज महापौर उपमहापौरपदी भाजप- शिवसेनाच्या महायुतीचे सदस्य विराजमान झाले आहेत. महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री संजय घाडी हे महायुतील शिलेदार मुंबईच्या महानगरपालिकेत कामकाज पाहणार आहेत. मुंबईच्या महानगरपालिकेला लोकाभिमुख पारदर्शी प्रशासन देण्यासाठी हे पदारोहण होत आहे. अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून रितू तावडे यांच्याकडे पाहिलं जातंय . मुंबईच्या विकासासाठी त्यांची नेहमी आक्रमक आणि आग्रही भूमिका राहिली आहे. त्यांना महानगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे आणि अनुभवाचा आम्हाला फायदा होईल. हिंदुहृदयसम्राट स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित असं मुंबईचं प्रशासन देण्याचं काम आम्ही करू. महापौर आणि उपमहापौर नवीन मुंबई घडवण्याला गती देण्याच्या कामी महापौर आणि उपमहापौरांना जी मदत लागेल ती मी आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे करणार आहोत.”
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबईकरांना मनापासून धन्यवाद, मुंबईकरांनी महायुतीला कौल देऊन महाविकासाला स्वीकारलं आहे. महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांचं मी अभिनंदन करतो. मुंबईत महायुतीने अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी महापौर आणि उपमहापौर दिले आहेत. मुंबईकरांना आम्ही वचन आणि आश्वासन दिली त्यावर मुंबईकरांनी विश्वास दाखवला आहे. मागच्या २५ वर्षे मुंबईकर विकासापासून वंचित होते त्यांना महायुतीने विकास करून मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी मागच्या काही वर्षांपासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आम्हाला कौल देत विकासाला प्राधान्य दिलेलं आहे. स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातली मुंबई घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनमधील जागतिक दर्जाचं शहर म्हणून आगामी काळात मुंबईला घडवण्यासाठी आम्ही महापौर आणि उपमहापौर यांना नक्कीच सहकार्य करू.”

