आधुनिक वीज व्यवस्थापनाचे सक्षमीकरण
आजच्या वेगवान डिजिटल युगात, तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. संवादापासून ते बँकिंगपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपण आधुनिकतेचा स्वीकार करत असताना, आपली वीज वितरण प्रणालीही मागे राहिलेली नाही. महावितरणने सुरू केलेली ‘स्मार्ट वीजमीटर’ योजना याच आधुनिक प्रगतीचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र, काही ठिकाणी या मीटरबद्दल गैरसमज किंवा विरोध दिसून येतो. दि. ९ ते २३ फेब्रुवारी या पंधरवाड्यात महावितरण स्मार्ट मीटर संदर्भात जनजागरण मोहीम राबवत आहे. त्यानिमित्त स्मार्ट मीटरची गरज, फायदे आणि त्याबाबतच्या शंकांचे निरसन करून, ग्राहकांची स्वीकारार्हता वाढवण्याच्या उद्देशाने हा शब्द प्रपंच केला आहे.
तंत्रज्ञानाचा प्रवास: जुन्याकडून स्मार्टकडे
पूर्वी वेळ पाहण्यासाठी यांत्रिक घड्याळे होती, नंतर इलेक्ट्रॉनिक्स आली आणि आता डिजिटल स्मार्टवॉच आली आहेत, ज्यात आरोग्याची माहितीही मिळते. वीज मीटरचा प्रवासही असाच यांत्रिक (चकतीचे) ते इलेक्ट्रॉनिक्स आणि आता स्मार्ट डिजिटल मीटरपर्यंत पोहोचला आहे. तंत्रज्ञानातील हा बदल स्वीकारणे काळाची गरज आहे.
स्मार्ट मीटर म्हणजे काय?
स्मार्ट मीटर हे केवळ मीटरिंग उपकरण नसून, ते ‘टू-वे कम्युनिकेशन’ प्रणालीवर काम करते. हे मीटर स्वयंचलित (automatic) मीटर रीडिंग घेतात आणि थेट महावितरणच्या प्रणालीला माहिती पाठवतात. यामुळे मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळला जातो.
गैरसमज आणि सत्यता
महावितरणच्या स्मार्ट मीटर योजनेबाबत काही चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत
• गैरसमज १: यामुळे बिल वाढेल ?
o सत्य: हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग होते. जुन्या मीटरमध्ये रीडिंग घेताना होणाऱ्या मानवी चुका किंवा अंदाजे बिल देण्याची पद्धत स्मार्ट मीटरमुळे बंद झाली आहे. तुम्ही जितकी वीज वापरली, तेवढेच अचूक बिल तुम्हाला मिळेल.
• गैरसमज २: मीटर बसवण्यासाठी पैसे द्यावे लागतील ?
o सत्य: नवीन वीज जोडणीसाठी किंवा जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. हे मीटर १०० टक्के मोफत आहेत.
• गैरसमज ३: हे प्रीपेड मीटर आहेत ?
o सत्य: सध्या बसवले जाणारे स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटर पोस्टपेडच आहेत. ग्राहकांना मासिक पद्धतीनेच बिलांची आकारणी होत आहे.
स्मार्ट मीटरचे ग्राहकांसाठी फायदे
विरोध मावळून स्वीकारार्हता वाढण्यासाठी ग्राहकांना होणारे थेट फायदे समजून घेणे आवश्यक आहे:
• अचूक आणि पारदर्शक बिलिंग : स्वयंचलित रीडिंगमुळे बिलिंगच्या तक्रारी पूर्णपणे संपुष्टात येतात आणि ग्राहकांचा मनस्ताप वाचतो.
• वीज वापराचे नियंत्रण : ग्राहक आपल्या मोबाईल ॲपवर दर तासाला, दिवसाला, आठवड्याला आणि महिन्याला झालेला वीज वापर रिअल-टाइममध्ये पाहू शकतात. यामुळे विजेचा वापर नियंत्रित ठेवण्याची सोय उपलब्ध होते.
• टीओडी (ToD) सवलत : स्मार्ट मीटरमध्ये टीओडी प्रणाली समाविष्ट आहे, ज्यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेवर प्रति युनिट ८० पैसे ते १ रुपयांपर्यंतची सवलत मिळते. यामुळे प्रामाणिक ग्राहकांचे वीज बिल कमी होत आहे.
• सौर ऊर्जा प्रकल्पासाठी उपयुक्त : ज्या ग्राहकांनी सूर्यघर योजनेतून किंवा इतर योजनेतून स्वत:च्या छतावर सोलर पॅनेल (Net Metering) लावले आहेत, त्यांच्यासाठी स्मार्ट मीटर अत्यंत उपयुक्त आहेत, कारण ते वापरलेल्या आणि ग्रीडला परत पाठवलेल्या विजेचा अचूक हिशोब ठेवते.
• जलद सेवा : वीज यंत्रणेतील बिघाड संबंधित अभियंत्यांना लगेच कळतो, परिणामी वीजपुरवठा खंडित राहण्याचा कालावधी कमी होतो.
• वापर तपासता येतो : सध्या तुमच्या घरात किती दाबाने वापर सुरू आहे हे समजते. तुम्ही दर तासाला, दिवसाला किंवा महिन्याला किती युनिट वीज वापरली याचा आलेख (Graph) पाहू शकता. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात वापर वाढला की कमी झाला, हे लगेच कळते. एखादे उपकरण (उदा. AC किंवा गीझर) सुरू केल्यावर रीडिंग किती वेगाने वाढते, हे पाहून तुम्ही वीज बचतीचे नियोजन करू शकता.
महावितरणने ग्राहकांचे हित आणि पारदर्शकता लक्षात घेऊनच स्मार्ट मीटरचा पर्याय निवडला आहे. हे तंत्रज्ञान वीज व्यवस्थापनात क्रांती घडवून आणणारे आहे. ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, एक जागरूक आणि आधुनिक नागरिक म्हणून स्मार्ट मीटरचा स्वीकार करणे हीच खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे.
विकास पुरी,
जनसंपर्क अधिकारी
महावितरण, पुणे परिमंडल

