महाराष्ट्रातून ७० प्रमुख प्रतिनिधींची उपस्थिती ; एप्रिल २०२६ मध्ये होणार अखिल हिंदू साहित्य संमेलन
पुणे : अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या दृष्टीने पुण्यात एक महत्त्वाची नियोजन बैठक सदाशिव पेठेतील पेरूगेट येथील भावे हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षपद कैलासनाथ नंदा यांनी भूषविले. बैठकीस संपूर्ण महाराष्ट्रातून विविध संघटनांचे सुमारे ७० प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी १५ प्रमुख समित्यांची रचना करण्यात आली असून, प्रत्येक समितीत ७ ते ८ प्रमुख कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियोजन प्रक्रियेत हिंदू नेटवर्कचे सुनील सोनवणे, प्रा. डॉ.संजय भांडारकर, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे श्रीनिवास कुलकर्णी, विश्व हिंदू परिषदेच्या धार्मिक विभागाचे संजय मुरदाळे, सक्रियपणे सहभागी झाले होते.
बैठकीत संमेलनाच्या कार्यक्रम रचनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित अखिल हिंदू साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी, कवी कट्टा, हिंदू साहित्यावर आधारित व्याख्याने, धर्मविचार मांडणारे परिसंवाद, तसेच पारंपरिक वाद्य व कला सादरीकरण यांचा समावेश असणार आहे. यासोबतच काही विशेष प्रकट मुलाखतीही घेण्यात येणार आहेत.
तसेच हिंदू धर्मासाठी जागरणात्मक व निःस्वार्थ कार्य करणाऱ्या विशेष व्यक्तींना संमेलनात “हिंदू तेज पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अखिल हिंदू साहित्य संमेलन एप्रिल महिन्यात विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात येणार असून, या बैठकीद्वारे संमेलनाच्या तयारीला अधिक गती देण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

