पुणे: “भारतीय कला आणि संस्कृतीचा वारसा हा केवळ इतिहास नसून तो आपल्या प्रगत भविष्याचा पाया आहे,” असे प्रतिपादन फिल्म्स विभागाचे माजी महासंचालक डॉ. मुकेश शर्मा यांनी केले.
पुणे महानगरपालिका आणि एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एडीटी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हेरिटेज यात्रा २०२६’चा समारोप पु. ल. देशपांडे कलाग्राम येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, प्र. कुलपती डॉ. नचिकेत ठाकूर, अधिष्ठाता डॉ. माधवी गोडबोले, डॉ. प्रिया सिंग आणि डॉ. अश्विनी पेठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावर्षीच्या महोत्सवाला पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दररोज सुमारे २,००० पर्यटकांनी नोंदणी करून या महोत्सवाला भेट दिली. एकूण २२ शाळांच्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला. महोत्सवादरम्यान रील मेकिंग, वादविवाद, निबंध लेखन आणि श्लोक पठण अशा विविध स्पर्धा पार पडल्या. तसेच हस्तकला विभागात पारंपरिक विटांची भिंत तयार करणे, वारली चित्रकला आणि मातीकाम अशा कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांनी भारतीय कलांचे बारकावे शिकून घेतले. अत्यंत कल्पकतेने डिझाइन केलेल्या ‘हेरिटेज प्लेलँड’मध्ये विद्यार्थ्यांना खेळता-खेळता इतिहासाची सफर घडली. यामध्ये प्रामुख्याने ‘महामिस्टरी’, ‘डार्ट अँड डिस्कव्हर’ आणि महाराष्ट्रासाठी स्वतःच्या ‘चलनाची रचना करणे’ यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता.
डॉ. मुकेश शर्मा यांनी आपल्या भाषणात हिंदीतून संवाद साधत तरुणांना मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय वारशाचे मूल्य समजून घेणे आणि तो पुढील पिढीसाठी जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या सोहळ्यात विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विश्वकर्मा ज्युनिअर कॉलेजने सलग दुसऱ्या वर्षी सहा पुरस्कार पटकावत आपले वर्चस्व राखले.
स्पर्धेत विश्वकर्मा कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्चस्व
या सोहळ्यात विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विश्वकर्मा ज्युनिअर कॉलेजने सलग दुसऱ्या वर्षी सहा पुरस्कार पटकावत आपले वर्चस्व राखले.
वादविवाद स्पर्धेत विश्वकर्मा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सार्थक भारेकरने, काव्यवाचन स्पर्धेत लोणी-काळभोर येथील एमआयटी व्हीजीएसच्या सान्वी मिश्राने, निबंध स्पर्धेत विश्वकर्मा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अभिषेक रामकिशन जाट, सोनाली राहुल कास्के आणि यश राहुल देशमुख यांनी प्रथम क्रमांक मिळवला. श्लोक पठण स्पर्धेत विश्वकर्माच्या भार्गवी बिराजदारने, तर श्लोक लेखन स्पर्धेत अहिल्यादेवी हायस्कूलच्या रेणुका कुलकर्णीने प्रथम क्रमांक पटकावला.

