“तुम घाटी, जय भीम वाले लोग कभी सुधरेगा नही” म्हणत मराठी तरुणास मारहाण केल्याचा होता आरोप
मुंबई-प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने एका मराठी तरुणास जातीवाच शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या सुशील रहेजा नामक बिल्डरला चांगलाच धडा शिकवला आहे. वंचितच्या महिला कार्यकर्त्यांनी या बिल्डरच्या कार्यालयावर धाव घेत त्याचे कार्यालय फोडले. या घटनेमुळे रहेजावर अक्षरशः पळून जाण्याची वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील सुशील रहेजा बिल्डरने त्याच्याकडे कामास असलेल्या राहुल जाधव या बौद्ध तरुणास क्षुल्लक कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केली होती. ऑफिसमध्ये सर्व स्टाफसमोर त्याला मारहाण केली होती. यावरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला होता. रहेजा बिल्डर विरोधात मुंबईतील गोवंडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीसुद्धा पोलिसांनी आरोपी रहेजा बिल्डरला अद्याप अटक केली नाही. यावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सुशील रहेजा शनिवारी त्याच्या चेंबूर येथील ऑफिसमध्ये होते. ही गोष्ट समजल्यावर वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी, वंचित बहुजन युवा आघाडीचे सागर गवई यांनी त्याच्या ऑफिसमध्ये धाव घेतली होती. ते तिथे पोहोचताच रहेजाने आपल्या कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुशील रहेजाचे ऑफिस फोडले.
पीडित तरुण राहुल जाधव हा बिल्डर सुशील रहेजाकडे कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी कागदपत्रे (पेपर) नीट स्टेपल न केल्याचा राग मनात धरून रहेजा यांनी राहुलला मारहाण केली. केवळ इतक्यावरच न थांबता, “तुम घाटी, जय भीम वाले लोग कभी सुधरेगा नही” असे वादग्रस्त आणि जातीवाचक शब्द वापरून त्याचा अपमान केला व स्टाफ समोरच मारहाण केली होती. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.
मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनीही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला होता. “तुम घाटी लोग सुधारोगे नही” म्हणत मुंबईतील बिल्डर सुशील रहेजा याच्याकडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ. भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची. केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे.
आता पाहूया आशिष शेलार, अमित साटम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो. मीरा-भाईंदरला मेहता महापौर, तर मुंबईत रहेजा बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण, या घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा आहेत! असा इशारा काळेंनी दिला आहे. बाकी, रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच, असा इशाराही गजानन काळे यांनी या प्रकरणी दिला आहे.

