जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी संपत असतानाच मोहोळ शहराजवळील ‘हॉटेल स्वराज्य’ येथे मध्यरात्रीच्या सुमारास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन हॉटेलमध्ये जात असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी त्यांना रंगेहात पकडल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे निवडणूक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आता गंभीर आरोप होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ शहराजवळ असलेल्या हॉटेल स्वराज्य आणि बारच्या परिसरात दोन सीलबंद ईव्हीएम मशीन आढळून आल्या. उमेश पाटील यांनी या संबंधित व्यक्तींना जाब विचारत हा प्रकार उघडकीस आणला. घटनेचे गांभीर्य ओळखून निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सीमा होळकर आणि पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
“मतदानाच्या पवित्र प्रक्रियेत अशा प्रकारे मशीन हॉटेलवर आढळणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. पारदर्शकतेचे दावे करणाऱ्या प्रशासनाने याचे उत्तर द्यावे,” अशी मागणी उमेश पाटील यांनी केली.
प्रशासनाचे स्पष्टीकरण: त्या राखीव मशीन्स होत्या
या गदारोळानंतर मोहोळचे तहसीलदार आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी प्रशासनाची बाजू मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अडवण्यात आलेल्या मशीन्स या ‘राखीव’ स्वरूपातील होत्या. या मशीनचा प्रत्यक्ष मतदानासाठी कुठेही वापर झालेला नाही. मतदान झालेल्या सर्व ईव्हीएम मशीन रात्री १०:३० वाजेपर्यंतच सुरक्षितपणे ‘स्ट्रॉन्ग रूम’ मध्ये जमा करून रूम सील करण्यात आली आहे. या राखीव मशीन्स अद्याप सीलबंद स्वरूपातच आहेत.
प्रशासनाने या मशीन्स ‘राखीव’ असल्याचे सांगितले असले, तरी त्या हॉटेल किंवा बारच्या परिसरात का नेल्या जात होत्या? याचे समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेले नाही. मतमोजणीला अवघे काही तास उरले असताना या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सरासरी ६५.९० टक्के मतदान झाले असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का सुमारे १ टक्क्याने घसरला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ७०.५५% मतदान सांगोला तालुक्यात झाले. तर सर्वात कमी ५८.३९% मतदान दक्षिण सोलापूरमध्ये झाले. या निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे.

